मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात आजी-माजी सहकारी एकत्र आल्यास भावी सहकारी होतील असे विधान केले. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. परंतु शुक्रवारी मुंबईत एक ब्रीज पडला यामुळे २१ हून अधिक कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनेवरुन नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधान केले असल्याचा दावा भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानामागे वेगळाच डाव होता असे नितेश राणेंनी म्हटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला यीतासाठी खुली ऑफर दिली असल्याचे तर्क लावण्यात येत आहे. परंतु नितेश राणेंनी वेगळा दावा केला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानामागे वेगळा डाव असल्याचा दावा केला आहे. नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, शुक्रवारी मुंबईतील बीकेसी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा गर्डर पडून मोठी दुर्घटना झाली. यामध्ये अनेक मजूर जखमी झाले. यावरुन मीडिया आणि नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत वक्तव्य केले का? असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.
Was the Sena BJP alliance statement only given to divert media attention from the MMRDA bridge collapse in BKC ?
Seems like it 😊— nitesh rane (@NiteshNRane) September 18, 2021
नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, शिवसेना-भाजप युतीबाबत कोणीही संकेत दिले नाही. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष सातत्याने भाजपला त्रास कसा देऊ शकतो असा प्रयत्न करत असतात. अशा पार्श्वभूमीवर जर त्यांनी म्हटलं जाईल की हे आमचे भावी सहकारी आहेत. म्हणजे स्वतःचे जे अपयश आहे. त्यांच्या नाकाखाली आणि नजरेखाली एमएमआरडीएचा ब्रीज कोसळतो, त्याचे खातेही त्यांच्याच पक्षाकडे आहे. यावरुन लोकांचे आणि मीडियाचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं आहे. त्यांनी जर तसं विधान केलं नसते तर माध्यमांनी त्यांना सोडलं नसते. परंतु हे सरकारचे अपयश आहे. हे अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधान केलं असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थित होते. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना व्यासपीठावर उपस्थिती भाजप नेत्यांकडे पाहून म्हटलं आहे की, जर आजी माजी एकत्र आले तर भावी सहकारी होतील. मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांकडे पाहून म्हटलं असल्यामुळे भाजपला खुली ऑफर दिली असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.