शिवथाळी साठी आधार कार्डची गरज नाही असं स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी दहा रुपयात जेवण देऊ अशी घोषणा केली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या महिन्यातच ‘शिव भोजन थाळी’ ही योजना बनविण्यात आली. तसेच २६ जानेवारी पासून मुंबईतील १५ ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे. मात्र शिवभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी ज्या अटी आणि शर्ती पुढे येत आहेत, त्यावरुन या योजनेवर टीका सुरु झाली आहे. तीन महिन्यांपर्यंत दहा रुपयांची थाळी घेण्यासाठी ग्राहकाला आपले आधार कार्ड दाखवावे लागणार आहे, तसेच फोटो देखील द्यावा लागणार आहे. अशी चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी शिवथाळी साठी आधार कार्डची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या विषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, शिवथाळी घेण्यासाठी कोणत्याच फोटो किंवा आधार कार्डची गरज नाही. जास्तीत डास्त गरीबांना याचा फायदा व्हावा यासाठी ही योजना आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१८ च्या दसरा मेळाव्यात दहा रुपयात थाळी देऊ असे आश्वासन दिले होते. सरकार आल्यानंतर आश्वासनाची पुर्तता देखील केली.
दहा रुपयात काय काय मिळणार?
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात एका दिवशी १८ हजार थाळ्या देण्यात येणार आहेत. यासाठी सरकारला तीन महिन्यांसाठी ६.४ कोटींचा खर्च येणार आहे. दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १५० ग्रॅम भात आणि १०० ग्रॅम डाळ असे पदार्थ थाळीत असतील. एका थाळीसाठी कंत्राटदाराला ५० रुपयांचा खर्च येणार आहे, तर राज्य सरकार ४० रुपयांचे अनुदान देणार आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे थाळीतील अन्नपदार्थांचा दर्जा वेळोवेळी तपासण्यात येणार आहे.