राज्यात गुलाबी चक्रीवादळामुळे ११ जिल्हयांना फटका बसला आहे. विशेष करून मराठवाडयाला याचा सर्वाधिक तडाखा बसला असून पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर आहे. नुकसानीची आकडेवारी आल्यानंतर ताबडतोब धोरण ठरवण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
गेला चार महिन्यांपासून राज्यात पाऊस, ढगफुटीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबी चक्रवादळाच्या तडाख्याने त्यात भर पडली आहे. ३० ऑगस्टपासून आतापर्यंत राज्यातील २८ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांना फटका बसला. अनेक ठिकाणी इतका पाऊस झाला आहे की, तिथे जाताही येत नाही. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आकडेवारी गोळा झाल्यानंतर ताबडतोब मदत देण्याचे धोरण ठरवण्यात येणार आहे. जमीन खरवडून गेली असेल तर वेगळे निकष, बागायत आणि फळबागासाठी वेगळे निकष लावण्यात येणार आहेत. ओल्या दुष्काळाबाबत शासन पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकर्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.