घरमहाराष्ट्रशिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

रायगडात शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला, तर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देईल तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी या सोहळ्यात केली.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले तसेच इतर लोकप्रतिनिधी तसेच  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी जातीभेद केला नाही. शिवाजी महाराजांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली. महाराज त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते. जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यांसमोर ठेवून कारभार करतोय याचा आम्हाला अभिमान आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना १ रुपयात पीक विमा देण्याची योजना केली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांविरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते. त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.
शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहचवण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
 यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनामनात पोहचवण्याचा संकल्प आपण केला आहे. यापुढील काळात किल्ले रायगडावर साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंब तलवार देशात आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. महाराजांच्या जीवनावरील गॅझेटीयर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. याशिवाय तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी ५ कोटी रुपये दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श जगभरातील लोकशाही मानणार्‍या देशांनी घेतला आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५०व्या सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ १ जूनपासून करण्यात आला आहे.
नवी दिल्लीत छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी करणार — उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे हे शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही शिवरायांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली. गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एक भारत-श्रेष्ठ भारत संकल्पनेत महाराजांचे प्रतिबिंब – पंतप्रधान नरेंद्र मोदी
     छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासन, राष्ट्र कल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्र निर्माणाचे व्हिजन दिले. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. आजही जलदुर्ग अढळपणे टिकून आहेत. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब एक भारत-श्रेष्ठ भारत या संकल्पनेत पाहायला मिळते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांविरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते. त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली. गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -