शेतकऱ्यांबाबत सरकारने कोडगेपणाचा कळस गाठला असून, सरकारला लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. नागपूर येथील आंदोलनात झालेला एका शेतकऱ्याचा मृत्यू आणि अमरावती येथे तुरीचे पैसे मिळण्यासंदर्भात झालेल्या आक्रमक आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.
खेडीकरांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही
शेतकरी संपाचा एक भाग म्हणून नागपूर येथील प्रजापती चौकात आंदोलन करणारे शेतकरी शरद खेडीकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे खेडीकर यांच्या मृत्युसाठी सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. परंतु, खेडीकर यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही. सरतेशेवटी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावेच लागेल, असा सूचक इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे.
सरकारच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
दरम्यान, सोमवारी काँग्रेसचे आमदार यशोमतीताई ठाकूर आणि आ. प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे तुरीच्या खरेदीचे चुकारे व इतर समस्यांसंदर्भात तीव्र आंदोलन झाले. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, ‘मन की बात’ मधून शेतकऱ्यांना डाळी पिकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या डाळीचा प्रत्येक दाणा खरेदी केला जाईल, असा शब्द खुद्द पंतप्रधानांनी दिला होता. पण शासकीय खरेदीची मुदत संपल्यावरही महाराष्ट्रात नाफेडकडे नोंदणी केलेल्या २ लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांची सुमारे २५ लाख क्विंटल तूर अजूनही पडून आहे. नाफेडने ४५ लाख क्विंटल तुरीच्या खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, या सरकारने केवळ ३३ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. खरेदी केलेल्या तुरीचे पैसे सरकारला अजूनही देता आले नाही. तुरीसह हरभरा, सोयाबीन अशा सर्वच शेतमालाच्या खरेदीमध्ये सरकारने प्रचंड निष्काळजीपणा दाखवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.