शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याने राहाता तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास योजनेच्या कार्यालयासमोर निदर्शने करत मोबाईल वापसी आंदोलन केले. शासनाने दिलेले मोबाईल निकृष्ठ असून, उच्च प्रतिचे मोबाईल देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील तब्बल 600 अंगणवाडी सेविकांनी मोबाईल प्रकल्पाधिकारी कुसुम नागरे यांना सुपूर्द केले.
केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रेकर अॅप्समध्ये दोष असून, शासनाने दिलेले निकृष्ट प्रतीचे मोबाईल कुचकामी ठरत आहेत. मोबाईलची वापर क्षमता कमी असून, अॅप्स डाऊनलोड होत नाही. तर थोड्या वापराने देखील मोबाईल गरम होत आहेत. तसेच, मोबाईल अनेकदा नादुरूस्त होत आहेत. त्यावेळी त्याच्या दुरूस्तीचा खर्च मिळत नाही. तर आधीच तुटपुंजे वेतन असताना स्वखर्चाने मोबाईल रिपेअर करावा लागत आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरित्या सर्व मोबाईल प्रकल्प अधिकार्यांकडे सुपूर्द केले.
राहाता पंचायत समिती कार्यालयासमोर झालेल्या मोबाईल वापसी आंदोलनात युनियनचे जिल्हाध्यक्षा मदीना शेख, सरचिटणीस राजेंद्र बावके, सहचिटणीस जीवन सुरूडे, वंदना गमे, मनिषा जाधव, वैशाली नाईक, ज्योती बोर्हाडे, नसिमा शेख, सीमा आरंगळे, सविता लोंढे, ज्योती पंडीत, शकिला पठाण, कल्पना नगरकर, बेबी उगले, सुनिता सुराशे, मनोरमा उदावंत, जनाबाई शेळके यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
अॅप आणि मोबाईलबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. पण काम करावे लागत असल्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. अंगणवाडी सेविकांना उच्च प्रतीचा मोबाईल मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत.
– कुसुम नागरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, राहाता