शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मंगळवारी सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. यावर रवींद्र वायकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जातात. यावरुन विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वायकर यांनी उद्धव साहेब यांच्या जवळचा आहे म्हणून बोलवलं असं मला वाटत नाही, असं सांगितलं.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रवींद्र वायकर विधानभवनात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे. आरोप वगैरे काही नाहीत. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यांना चौकशीचा अधिकार असून त्यानुसार त्यांनी मला बोलावलं होतं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. बोलावल्यानंतर जाणं आणि स्पष्टीकरण देणं हे या देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे, असं रवींद्र वायकर म्हणाले.
वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी
शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणी वायकर यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आल्याचे समजते.
रविंद्र वायकर हे मंगळवारी दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल ८ तास त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. ८ तास शिवसेना आमदार रविंद्र वायकर हे ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. त्यांना नेमके कोणत्याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुषंगाने ईडीने रविंद्र वायकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले असल्याचे समजते. त्यानुसार रविंद्र वायकर हे चौकशीसाठी हजर झाले होते. आज झालेल्या या चौकशीतून आता नेमकं काय बाबी समोर आल्यात, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.