दहावीचा निकालानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला नोदणी सुरू झाली आहे. त्याप्रमाणे १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला राज्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यामध्ये सात दिवसांमध्ये आयटीआय प्रवेशासाठी तब्बल ८४ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अमरावती विभागातून सर्वाधिक तर त्याखालोखाल नाशिक व पुणे विभागातून नोंदणी झाली आहे. नोंदणीमध्ये मुंबई विभाग अखेरच्या क्रमांकावर आहे.
कौशल्याधारित विद्यार्थी घडावेत यासाठी सरकारकडून आयटीआय अभ्यासक्रमांवर अधिक भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय संस्थांमध्ये असलेल्या १ लाख ४५ हजार ८२८ जागांसाठी १ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. या प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ८४ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केल्यानंतर ६२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. तर ४५ हजार ३९ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहेत. तसेच २८ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी विकल्प सादर केले आहेत. अर्ज पूर्ण भरणे, शुल्क भरणे, विकल्प सादर करण्यामध्ये अमरावती, नाशिक, पुणे या विभागातील विद्यार्थी आघाडीवर आहेत. सात दिवसांमध्ये अमरावती विभागातून सर्वाधिक ११ हजार ८१० विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले. त्याखालोखाल नाशिकमधील ११ हजार ५२३ आणि पुणे ११ हजार १२० विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. त्याचप्रमाणे शुल्क भरल्यानंतर अमरावती विभागातून सर्वाधिक ५७५२ विद्यार्थ्यांनी विकल्प सादर केले आहेत. त्याखालोखाल नाशिक ५१८०, पुणे ५४७८ विद्यार्थ्यांनी विकल्प सादर केले आहेत.
रोजगारक्षम शिक्षणावर केंद्र सरकारसह राज्य सरकारचा भर असला तरी कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विभागातून सर्वाधिक कमी ६९१२ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. त्यातील फक्त २९१२ विद्यार्थ्यांनी शुल्कासह विकल्प अर्ज भरले आहेत.