सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्राचा मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर फार राजकारण न करता एकत्र यावं, असं आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वच नेत्यांना, सर्वच पक्षांना हवा आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे, असं देखील राऊत म्हणाले.
देवेद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणप्रश्नी ठाकरे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं म्हटलं. यावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव अजिबात नव्हता, असं स्पष्ट म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी जो लढ्यासाठी मार्ग दाखवला होता त्याच मार्गावर पुढील सरकारने काम केलं आहे. त्यांनी नेमलेले वकील आहेत, त्यांनी तयार केलेला कायदा आहे. राज्यातील विद्यमान सरकारने केवळ त्या मार्गावर लढाई सुरु ठेवली. अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण न करता, मराठा समाजासाठी कायमस्वरुपी काय मार्ग काढण्यासाठी एकत्र यावं, असं संजय राऊत म्हणाले.
“सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की हा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. केंद्र सरकारला, राष्ट्रपतींना हा अधिकार आहे. आम्ही सगळे जाऊ राष्ट्रपतींकडे आणि पंतप्रधानांकडे विरोधी पक्षाने आमच्या सोबत यावं, त्यांनी नेतृत्व करां कुणी अडवलं,” असं राूत म्हणाले. आम्ही केंद्राकडे बोट दाखवलेलं नाही, बोट दाखवलं सर्वोच्च न्यायालयाने, कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, मग बोट दाखवण्याचा प्रश्न येतो कुठे? आम्हाला बोटही दाखवायचं नाही अन् हातही दाखवायचं नाही, आम्हाला त्यांच्याकडे नजर वळवून पण बघायचं नाही, ्सा उपहासात्मक टोला देखील राऊतांनी लगावला.
छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाप्रकरणी पंतप्रधान मोदी यांची भेट मागत आहेत. त्यांना सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ घेऊन जायचं आहे. मग पंतप्रधान मोदी त्यांना का भेटत नाहीत? ्सा सवाल देखील राऊत यांनी केला.