पुणे : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असे म्हणत महायुतीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि कोल्हापुरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर टीका केली. त्यांनी केलेल्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापसले असून मविआतील नेत्यांनी संजय मंडलिक यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याच प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली असून मंडलिक यांना खडेबोल सुनावले आहेत. (Sharad Pawar on Sanjay Mandlik critism of Chhatrapati Shahu Maharaj)
आज गुरुवारी (ता. 11 एप्रिल) पत्रकार परिषदेत बोलताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले की, राजघराण्यात मूल दत्तक घेणे ही नवी पद्धत नाही. दत्तक मूल घेतल्यावर तो त्या घराण्याचा प्रतिनिधी होतो. आज ज्यांच्याबद्दल बोलले जात आहे, याचा अर्थ किती खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे हे दिसते. शाहू महाराज यांची जनमाणसात चांगली प्रतिमा आहे. त्यांचे सामान्य माणसात चांगले काम आहे. शाहू महाराजांबद्दल लोकांच्या मनात कृतज्ञता आहे. असे असताना त्यांच्याबद्दल बोलले जात आहे, याचा अर्थ मानसिकता काय आहे हे लक्षात घ्या, अशा तीव्र शब्दांमध्ये शरद पवारांनी संजय मंडलिक यांना सुनावले आहे.
खासदार संजय मंडलिक यांनी मविआचे कोल्हापुरचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्यावर केलेल्या टीकेचे राजकारणात तीव्र पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ‘कोल्हापूरच्या गादी विषयी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काढलेले उद्गार हे अत्यंत निंदनीय आहे. त्यांना कोल्हापूरकर उत्तर देतील. पण त्यांचे हे उद्गार भाजपाच्या ग्रँड स्ट्रॅटेजीचा भाग तर नाही ना?’ असा सवालही चव्हाण यांच्याकडून उपस्ठित करण्यात आला आहे.
काय म्हणाले संजय मंडलिक?
कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील नेसरी येथील सभेत बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी मविआतून काँग्रेसतर्फे निवडणूक लढणारे छत्रपती शाहू महाराज यांच्याबाबत बोलताना जीभ घसरली. मल्लाला हातच लावायचा नाही… मल्लाला टांगच मारायचे नाही… मग ती कुस्ती कशी होणार? कुस्ती तर झाली पाहिजे…, असा टोला मंडलिक यांनी शाहू महाराज यांचे नाव न घेता लगावला.
तर, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांच्याकडून करण्यात आले. पण ते इतक्यावरच नाही थांबले तर ते पुढे म्हणाले की, माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. कारण ही शाहू महाराजांची भूमी आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पुरोगामी व समतेचा विचार जपला शिकवला. या जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक महिला, पुरुषमध्ये जन्मजात डीएनएमध्ये हवेत आणि पाण्यात शाहूंचे गुण आहेत, असेही मंडलिक यांच्याकडून सांगण्यात आले.