उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान खा. रविंद्र गायकवाड यांना डावलून शिवसेनेने अन्य उमेदवाराला संधी दिली. या कारणास्तव नाराज झालेले समर्थक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर यायला निघाले. परंतु मध्यरात्री वाशी टोल नाक्यावर पोलिसांनी ४ बसेस रोखल्या. यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्ते, समर्थकांनी माघारी फिरावे, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे सर्व जण माघारी फिरले. खा. गायकवाड यांनी गेल्या पाच वर्षांत चांगले काम केले असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.
विमानात केली होती मारहाण
खा. गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केल्यामुळे ते आधीच वादात अडकले होते. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांना डावलत शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केली होती. या कारणास्तव गायकवाड समर्थक पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. दरम्यान गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांमध्ये या बाबत अधिकृत वक्तव्य करणे टाळले आहे.