भाजपसोबत जुळवून घ्या अशी मागणी बंडखो आमदार आणि खासदारांनी केल्यानंतरही शिवसेनेने आपला भाजपबद्दलचा आक्रमक बाणा कायम ठेवला आहे. चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेला सीमाप्रश्न तसेच काश्मीरमधील तणावावरून शिवसेनेने सामनामधून मोदी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिंदे गटावरही निशाणा साधला आहे.
कश्मीरमध्ये पाऊल ठेवायला हवे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पाकने गिळलेल्या आमच्या कश्मीरमध्ये पाऊल ठेवायला हवे होते. सोबत महाराष्ट्रातील नवमर्द शिंदे, केसरकर, सामंत, भुसे यांना न्यायला हवे होते. भाजपच्या नादास लागून शिवसेनेत फूट पाडल्यापासून या ‘नवमर्द’ गटासही हिंदुत्वाची मोठीच सुरसुरी आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या सुरसुरी फुटीर गटासह पाकव्याप्त कश्मीरात पाऊल ठेवून देशासमोर आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे, अशी टीका शिवसेनेने सामनातून शिंदे गट आणि मोदी सरकारवर केली आहे. पुढे त्यांनी एकीकडे काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांकडून कुरबुरी सुरू असताना केंद्र सरकार मात्र यंत्रणांचा गैरवापर करण्यात व्यग्र आहे, अशा टोला केंद्र सरकारला लगावला आहे.
केंद्राच्या धोरणावर टीका –
चीनच्या विरोधानंतरही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या भूमीवर पाऊल ठेवले. तैवान हा चीनचा प्रदेश असल्याच्या वल्गना फेटाळून लावल्या व अमेरिकेचे लोक तैवानमधे घुसले. चीनने अमेरिकेला इशारा देण्याशिवाय काय केले? इकडे आमच्या देशातील लडाख भूमीवर चीनचे सैन्य घुसून बसले व ३८ हजार चौरस किलोमीटर जमिनीचा ताबा घेतला.कश्मीरात फुटिरांचे झेंडे फडकले आणि आम्ही राजकीय विरोधकांवर छापेमारी व अटका करण्यातच धन्यता मानीत आहोत. चीनचे सैन्य इथेच आहे व मेहबुबांच्या ‘डीपी’वर ‘कश्मीर’चा ध्वजही तसाच आहे! देशात फुटिरांचा हा असा ‘उत्सव’ सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे, अशी टीका शिवसेनेने केंद्र सरकाच्या धोरणावर केली आहे.