क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणात आज मोठा गौप्यस्फोट झाला. किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून आर्यन खान प्रकरणातील खळबळजनक माहिती दिली. या व्हिडिओसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले की, एनसीबीच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करण्याच काम सुरू आहे. जेणेकरून महाराष्ट्र, मुंबईतून फिल्म इंडस्ट्री निघून जावी.’
नक्की काय म्हणाले संजय राऊत?
पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, ‘सुशांत सिंग राजपुतच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार मुंबई, महाराष्ट्रात फारच कामाला लागला. जणू काही मुंबई, महाराष्ट्रात अफगाणिस्तान, पाकिस्तान प्रमाणे घराघरामध्ये, गच्चीवर, गॅलरीमध्ये अफू, चरस, गांजांची लोकं पिकं काढतात आणि राज्यातील लोकं सर्वत्र अफू, गांजाचा व्यापार, व्यवहार करतात. अशी बदनामी देशभरात सुरू आहे. मुंबईतील फिल्म इंडस्ट्री ही मुंबईचे वैभव आहे. एनसीबीच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण होण्याचे काम होत आहे. जेणे करून इंडस्ट्री बदनाम होईल आणि मुंबईतून निघून जाईल. त्यामुळेच महाराष्ट्रातून फिल्म इंडस्ट्री निघून जाण्यासाठी हे षटयंत्र रचलं जात आहे.’
पुढे राऊत म्हणाले की, ‘एका सुपरस्टारच्या मुलाला अटक केली, ठिक आहे. पण सुशांत राजपूतच्या प्रकरणापासून मग रिया चक्रवर्ती असेल किंवा अन्य काही लोकं असतील. सतत असे काही गुन्हे किंवा खटले निर्माण केले की त्याच्यावर संशय यावा. जर केंद्रीय यंत्रणेच्या तपासावर संशय व्यक्त केला की, मग आरोप करणाऱ्यावरती राजद्रोही आहात, राष्ट्रद्रोही आहात. पाकिस्तानचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात, असे आरोप केले जातात. आज नवाब मलिक कॅबिनेट मंत्री आणि एक जबाबदार मंत्री आहेत. ते मुस्लिम समुदायाचे आहेत, म्हणून त्याच्यावर आरोप केले जातायत. नवाब मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि त्याचा आरोप कोणत्याही हवेतला गोळीबार नाही आहे. खरं म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांच्या पाठिमागे ठामपणे उभं राहिला पाहिजे.’
‘कालपासून एनसीबीच्या अधिकाऱ्यांविरोधात काही पुरावे समोर येतायत. जे पंचनामे झालेत किंवा जे पंच म्हणून, साक्षीदार म्हणून पुढे आले ते कोण होते? किती संशयास्पद चारित्र्याचे लोकं होते? याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण कारवाईत कशी झाली? याचे पुरावे समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते, ‘अंमली पदार्थ संदर्भात महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी काही लोकांनी घेतली आहे.’ ते आता सिद्ध झाले. आज दोन प्रमुख व्हिडिओ समोर आले आणि ते बोलके आहेत. त्यात लपवाछपवी करण्याची गरज नाही. या सगळ्या प्रकरणाची कठोर चौकशी महाराष्ट्र सरकारने करायला हवीय. अगदी खोलात जाऊन करावी. वाटल्यास न्यायालयीन चौकशी करावी. कारण हे प्रकरण साधं नाही आहे. फक्त एखादा गोळीबार झाला तरचं न्यायालयीन चौकशी तर नाही. हे सुद्धा तितकच गंभीर प्रकरण आहे. एनसीबीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्रात काम करतात, राज्याला बदमान करतात हे देशाला कळालं पाहिजे,’ असे राऊत म्हणाले.
हेही वाचा – cruise drug bust : शाहरुख खानने भाजपात प्रवेश केल्यास ड्रग्जची पिठी साखर होईल, भुजबळांचा भाजपवर निशाणा