मुंबई : ईडीचे मोठे अधिकारी भाजपचे तिकीट घेऊन निवडणूक लढवत असून ईडीच्या ज्या अधिकाऱ्याने निवडणूक लढवली त्याने इतर 50 जणांचा खर्चही केला. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. खंडणीखोरीच्या बाबतीतला सगळा कच्चाचिठ्ठा पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, पण तुम्ही आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नव्हे तर भ्रष्टाचारही साफ करायला हवा, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी भाजपला लगावला.
संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी यावेळी ईडी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला. मागच्या काही वर्षापासून ईडीच्या अधिकाऱ्यांच्या दलालाचे एक जाळे बिल्डर, विकासक आणि कॉर्पोरेटरला धमकावण्याचे काम करीत आहे. जितेंद्र नवलानी हे सगळ्यात महत्वाचे नाव आहे. ६० कंपन्यांनी १०० पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसूल केले आहेत. यात रोख रक्कम आणि आणि चेक पेमेंटही आहे. डिजीटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्यांची ईडीने चौकशी केली, त्या कंपन्यांची ईडीचा पैसा वळता केला. हा नवलानी ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी काम करतो, असा दावा संजय राऊत यांनी केला.
ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्सची २०१७ पासून चौकशी सुरु केली. जितेंद्र नवलानीच्या कंपनीला २५ कोटी वळते केले. मग ३१ मार्च २०२० पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग भोसलेंकडून नवलानीला १० कोटी वळते झाले. नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपये वळवले गेले. १५ कोटी रुपयांबाबत अशाच एका चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. सेक्यूरिटी ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही तर ईडीचा असा सर्व पैसा हा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश, चेक अशा वेगवेगळ्या स्वरुपात वळवला गेला. ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या खात्यात कुठे कसे पैसे गेले हे आपण हळूहळू सांगू, असेही राऊत म्हणाले.
इडी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार तसेच खंडणीबाबत आपण मुंबई पोलिसांकडे तक्रार देत असून त्यात चार ईडी अधिकाऱ्यांसह नवलानीच्या नावाचाही समावेश आहे. मुंबई पोलिस आजपासून चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस सक्षम आहेत, असा दावा करत राऊत यांनी एकप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांना आणि भाजपला इशाराही दिला. ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा मी आज तुमच्यासमोर आणला आहे. पुढच्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांच्या नावासकट सर्वकाही सांगेन. या सगळ्याचा सूत्रधार कोण ते मी तुम्हाला सांगेन, असेही संजय राऊत म्हणाले.