गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल बुधवारी संजय राऊत यांनी सोमय्यांनी ईडीच्या नावाने धमकी देऊन एका जमीन मालकाकडून १०० कोटींचा फ्लॅट मातीमोल भावात बिल्डर मित्र अमित देसाईच्या नावावर केल्याचा आरोप केला होता. आज संजय राऊत यांनी सोमय्यांवर नवा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाहांच्या नावाने धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
नक्की काय म्हणाले राऊत?
‘एकेदिवशी किरीट सोमय्या स्वतःच्या हातातली चप्पल घेऊन स्वतःलाच मारतील आणि महाराष्ट्रातील लोकं त्यांची एक दिवस कपडे काढून धिंड काढतील,’ असे म्हणत राऊतांनी सोमय्यांचा नवा घोटाळा आज समोर आणला. पवईतील पेरुबाग पासपोली येथे जवळपास १३८ एकरचा भूखंड आहे. या ठिकाणी पुनर्वसनाच्या नावाखाली ४३३ बोगस लोकांना सोमय्यांनी घुसवले आहे. त्यांचा यावर अधिकार नाही. पण किरीट सोमय्यांच्या एजंटीने बाहेरील ४३३ लोकांना घुसवले. आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याच्या पेपरवर सही केली. या ४३३ लोकांकडून एजंटच्या मार्फत सोमय्यांनी प्रत्येकी २५ लाख रुपये घेतले. हा २०० ते ३०० कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. यामध्ये फडणवीसांना पैसे द्यायचे सांगून सोमय्यांनी वसूली केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
‘हा लफंगा आणि चोर आहे’
‘या घोटाळ्याच्या काळात शेकडो कोटी रुपये सोमय्यांनी फडणवीसांच्या नावाखाली वसूली केल्याची प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. आता फडणवीस आणि भाजपने यांचे उत्तर द्यावे. या घोटाळ्याचे प्रकरण घेऊन मी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जात आहे. रोज एक भ्रष्टाचाराचे प्रकरण मी बाहेर काढणार आहे. माझ्याकडे आतापर्यंत लोकांनी समोर येऊन किरीट सोमय्यांची २११ प्रकरणे दिली आहेत. आणि या एकूण घोटाळ्यात गेल्या काही वर्षात किरीट सोमय्यांनी साडे सात हजार कोटी रुपये गोळा केले आहेत. याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना असेल असे मला वाटत नाही. जसे ईडीच्या नावावर वसूली चालू आहे, सीबीआयच्या नावावर या माणसाने वसूली केली, हा माणूस दलाल आहे. हा लफंगा आणि चोर आहे. तसेच दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या नावावरही सोमय्यांनी वसूली केली आहे, ती सुद्धा मी प्रकरण काढणार आहे. सोमय्यांनी अमित शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढले आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांच्या नावावरती कोट्यावधी रुपये सोमय्यांनी उकळले आहेत,’ असे गंभीर आरोप सोमय्यांवरती आज राऊतांनी केले आहेत.