शिवसेनेचं लक्ष आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. शिवसेनेनं नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीनं पक्षाची बांधणी सुरु केली आहे. लवकरच पर्यटनमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
संजय राऊत म्हणाले, “नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीनं पक्षाची बांधणी सुरु आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नागपूरविषयी चर्चा झाली. नागपुरात संघटनात्मकदृष्टीने काही प्रमुख नेमणुका करण्यासंदर्भात त्यांच्या सूचना आहेत. पण विदर्भात शिवसेना पक्ष वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजे. उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे. एकेकाळी शिवसेनेची ताकद फार चांगली होती, आताही वाढेल. नेते जातात तेव्हा लोकं, कार्यकर्ते जमतात, विविध क्षेत्रातील मान्यवर जमतात, त्यांना शिवसेनेबरोबर काम करण्याची इच्छा आहे. हळूहळू त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू. आदित्य ठाकरे सुद्धा नागपूरला शासकिय कामासाठी जाणार आहेत. तेव्हा ते सुद्धा पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
प्रामुख्याने विदर्भावर लक्ष
“संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लक्ष केंद्रीत करतोय. पण प्रामुख्याने विदर्भात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. २०२४ साली विधानसभेच्या निवडणुकीत मजबूतीनं आम्हाला उभं रहायचं असेल तर विधानसभेच्या ६५ जागा असलेल्या विदर्भात आम्हाला काम करावं लागेल. मोठ्या प्रमाणात आमचं काम सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये काम सुरु आहे. उद्धव ठाकरे सुद्धा पक्षकार्यामध्ये ते स्वत: लक्ष घालतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते संपूर्ण राज्यात लक्ष घालत आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव, कोरोनामुळे थोडी बंधणं होती यातून आम्ही आता बाहेर पडलोय. संघटनात्मक बांधणीला प्राधान्य आहे, आणि ते आम्ही सुरु केलं आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
महाराष्ट्रभर दौरा सुरु असल्याने ८० हजार कामगार कामावर परतले
सरकारने, गृहखात्याने कठोर कारवाई केल्यानंतर एसटीचा संप जवळजवळ संपलेला आहे. कोणीतरी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. कुठली तरी अज्ञातशक्ती ही कामगारांना भडकवून मुंबईसह महाराष्ट्रात उद्रेक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि शरद पवार यांच्या घरावर चाल करुन गेले. तिथेच ठिणगी पडली आहे. सरकारने कठोर कारवाई करुन याचं नेतृत्व करणारे लोकं होतं, ज्यांना राजकीय शक्तींचा पाठबळ होतं. ते सगळे तुरुंगात गेल्यामुळे त्यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरु असल्यामुळे ८० हजार कामगार आज कामावर परतले आहेत आणि लाल परी पुन्हा सुरु झाली आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर दिली.