विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. विधानसभा अध्यक्षांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध असे म्हणत फेसबुक पोस्ट केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संसदीय मर्यादा व परंपरा पाळणारा पक्ष आहे.पण तरीही सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांना बोलू दिले जात नाही.त्यांचा आवाज दडपला जातो. आज तर कहरच झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार हे सातत्याने विनंती करीत असताना देखील विधानसभा अध्यक्षांनी ऐकले नाही. त्यानंतर तर थेट जयंत पाटील यांच्यासारख्या समंजस, ज्येष्ठ सदस्यांचे निलंबन करण्यात आले, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली सरकारचे अपयश उघड होईल या भीतीपोटी अध्यक्षांच्या मार्फत ही दडपशाही सुरु आहे. जनतेच्या प्रश्नांना सामोरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या या दडपशाहीचा निषेध. जनतेच्या प्रश्नांवर आमचा लढा सडक ते संसद सुरु राहिल, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव माडंला. या ठरावानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच काही चुकलं तर ती चुक मान्य करून पुढे गेलं तर त्यातून एक चांगलं वातावरण तयार होईल असं अजित पवार म्हणाले.
अध्यक्ष पदावरील व्यक्तीबद्दल आदराची भावना आहे. ती भावना पुढेही चांगल्या पद्धतीने ठेवू असा विश्वास अजित पवारांना व्यक्त केला, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या बाबतीत काही गैर करून घेऊन नका अशी विनंतीही अजित पवार यांनी केली. मात्र, त्यानंतरही जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
हेही वाचा : जयंत पाटलांची ती चूक मान्य…; अजित पवारांनी व्यक्त केली