घरमहाराष्ट्र'त्या' रुग्णाचा मृत्यू करोनाने नाही; मात्र दहशतीने बुलढाण्यात शुकशुकाट!

‘त्या’ रुग्णाचा मृत्यू करोनाने नाही; मात्र दहशतीने बुलढाण्यात शुकशुकाट!

Subscribe

सौदी अरेबियातून आलेला आणि करोनाचा संशयित म्हणून उपचारादरम्यान मृत्यू झालेली व्यक्ती करोनाचा रुग्ण नव्हती, असे अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी करोना रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे बुलढाण्यात दहशत निर्माण झाली आहे. त्याचा आठवडी बाजारावरही परिणाम झाला असून रविवारी आठवडी बाजारात शुकशुकाट होता. एसटी स्टँडही ओस पडले होते.

सर्दी व तापाची लक्षणे असलेला करोनाच्या संशयित रुग्णाला बुलढाणा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात शनिवारी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी हा संशयित रुग्ण सौदी अरेबियातून आला होता. त्यांची मुंबई विमानतळावर तपासणीही करण्यात आली होती. मात्र, त्यांची प्रकृती चांगली वाटल्याने त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, घरी आल्यावर त्यांना सर्दी, ताप आला. त्यामुळे ते खासगी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे डॉक्टरांना संशय बळावल्याने त्यांनी त्यांची रवानगी जिल्हा सामान्य हॉस्पिटलात केली. संबंधित रुग्णाचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली होती. आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. यासंबंधी रविवारी अधिकृत रिपोर्ट आला असून त्यात त्याला करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी रात्रीच या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.

- Advertisement -

‘ते’१२ जण निरीक्षणाखाली

बुलढाण्यात विदेशातून १२जण आलेले असून त्यांच्यावर प्रशासन वॉच ठेवून आहे. यातील तीन जणांना खामगाव येथील उपचार कक्षात ठेवण्यात आले असून ९ जणांवर देखरेख करण्यात येत असल्याचे पंडित यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यात बारा विदेशी पाहुणे आपल्या नातेवाईकांकडे खामगाव येथे आले होते. यातील तीन जणांना खामगाव येथे उपचार कक्षात (विलीनीकरण कक्ष) ठेवण्यात आले असून नऊ जणांना बुलढाणा येथे निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या पाहुण्यांना चौदा दिवस निगराणी खाली ठेवण्यात येणार असून करोनाचे गांभीर्य पाहता सर्वतोपरी खबरदारी आरोग्य विभागाकडून ठेवण्यात आली असल्याचे पंडित म्हणाले. यामध्ये सात जण इंडोनेशिया आणि पाच जण मलेशिया येथून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -