कोकणातील जनआशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र डागणाऱ्या राऊतांवर नारायण राणे यांनी पलटवार केला. सामनातून नितेश राणे आणि निलेश राणेंवर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. याच सर्व पार्श्वभूमीवर नारायण राणे शिवसेनेला इशारा देत म्हणाले की, ‘वैयक्तिक गोष्टी त्याने जर सुरू केले तर मीही जनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर माझ्या प्रहारमधून वैयक्तिक गोष्टी काढण्यास सुरुवात करेन.’
नक्की काय म्हणाले नारायण राणे?
नारायण राणे म्हणाले की, ‘जनआशीर्वाद यात्रेत मधेमधे अपशकुन झाले. कुठेतरी मांजरी आडवी गेली. तसेच अग्रलेखातून येतंय कोणाच्या मुलांचंय काय वैगेरे. आपली मुलं किती पराक्रमी आहे ते बघा. ज्यांची तळी उचलतो त्या संजय राऊतला सांगेन, तुझ्या मालकांची मुलं काय करतात ते बघं. आम्हाला संजय राऊत प्रवृत्त करतोय बोलायला. राऊतामुळे शिवसेना वाढत नाही तर ती अधोगतीकडे चालली आहे, खड्ड्यात चालली आहे. संजय राऊतांची बौद्धिक प्रतिमा लोकांमध्ये अजिबात चांगली नाही आहे. त्याला माझी मार्गदर्शन करण्याची तयारी नाही. अशा माणसाला मार्दर्शन करून फायदा नाही आहे. असं भेटल्यावर चांगलं बोलायचं कौतुक करायचं. लेखणी हातात आली, वरुन फोन आला की मग येरे माझ्या मागल्या.’
पुढे राणे राऊतांना म्हणाले की, ‘माझ्या मुलांसोबत बरोबरी करू नको. माझं त्यांच्यावर नियंत्रण आहे. दोघं हुशात आहे, चांगले शिकलेले आहेत. ते कोणतंही कृत्य, वाईट गोष्टी करणार नाही याच्यावर माझा विश्वास आहे. वैयक्तिक गोष्टी काढायला त्याने जर सुरू केले तर मी पण जनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर प्रहारमधून सुरू करेन. मग कोणाचं बसणं उठणं कुठे असतं?, काय करतात?, कोणत्या केसमध्ये कसे संबंध आहेत? हे सगळं समजेल.’
हेही वाचा – १०० कोटी वसुली प्रकरण : अनिल देशमुखांना CBI कडून क्लिनचिट?