घरमहाराष्ट्र...तर पुन:श्च लॉकडाऊन होईल

…तर पुन:श्च लॉकडाऊन होईल

Subscribe

आता आपल्याला करोनासोबत जगायचे असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येत आहे. काही गोष्टी अंगवळणी पडायला हव्यात यासाठी निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पुनश्च हरिओम म्हणून आपण काही सवलती दिल्या. मात्र त्या देताच सगळ्यांचीच रस्त्यावर झुंबड उडाली. सरकार देत असलेली ही उघडीप जीवघेणी ठरत असल्यास पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुधवारी दिला. मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आपल्याला करोनासोबत अतिशय सावध राहून जगावे लागणार आहे. त्यामुळेच सरकार अतिशय सावधपणे पावलं टाकत आहे. आपण कोणतीही घाई करत नाही. टप्प्याटप्प्याने आपण लॉकडाऊन लागू केला.

आता टप्प्याटप्प्याने आपण निर्बंध शिथिल करत आहोत. सकाळी व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी सवलत दिली आहे. मात्र ही सवलत देताच रस्त्यांवर गर्दी झाली. ही गर्दी टाळायला हवी. जर लोकांनी गर्दी करणे कमी केले नाही, जी शिथिलता आहे त्यातून नुकसान होत आहे, हे लक्षात आले तर नाइलाजाने पुन्हा कठोर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

- Advertisement -

सरकार गंभीर आहे
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या रुग्णालयांमधील भोंगळ कारभार समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह बोरीवली रेल्वे स्थानकात आढळून आला. त्याबद्दल प्रश्न विचारला असता, सरकार करोनाविरुद्धची लढाई गांभीर्याने लढत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकार गंभीर नसते, तर देशातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा उभारल्या गेल्या नसत्या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.

लोकलसाठी पाठपुरावा
मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. जीवनावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांसाठी केंद्राकडे लोकलची मागणी केली आहे. लोकलसेवा सुरू नसल्याने रुग्णालयांमध्ये काम करणार्‍या अनेक कर्मचार्‍यांना कर्तव्यावर जाता येत नाही. लोकलसेवा सुरू झाल्यास त्यांना रुग्णालयात जाणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -