मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने उसंत घेतली होती. मात्र आता भाद्रपद महिना सुरू होताच पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये देखील पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 8 सप्टेंबरपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्री वादळामुळे 7 सप्टेंबरपर्यंत या भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.तसेच हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात गेल्या 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
परळीत झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणी साठलं होतं. एक तास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तीन आठवड्यापासून उसंत घेतलेल्या पावसामुळे शेताततल्या पिकांनी माना टाकली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.