घरमुंबईसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

सेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

Subscribe

अहमदनगर महापालिकेत ६७ टक्के मतदान

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६७ टक्के इतके मतदान झाले. दुपारपर्यंत मतदानाला मोठा प्रतिसाद होता. दोन वाजेपर्यंत ३९ टक्के इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाला सुरुवात होत असताना सकाळीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सागर थोरात असे या शिवसेना कार्यकर्त्याचं नाव आहे. वॉर्ड क्रमांक 12 मधील सागरवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यामध्ये 351 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत 2 लाख 56 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्र उभारण्यात हे मतदान पार पडले. यात 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र होते. या मतदानकेंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व म्हणजे 68 जागांवर आपले उमेदवार दिले आहे. विशेष म्हणजे यात 35 महिला उमेदवार भाजपने दिल्या आहेत. तर शिवसेनेने 61 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीने 46 तर काँग्रेसने 21 उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहेत. या निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि काँग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे कधीही महानगरपालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार हे पाहावे लागणार आहे.

छिंदमच्या भावाकडून ईव्हीएमची पूजा
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमच्या भावाने चक्क मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा केली. श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम याने सकाळी ईव्हीएम मशीनची विधीवत पूजा केली. श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे. मात्र त्याला तडीपार करण्यात आले आहे.

- Advertisement -

कर्मचार्‍याचा मृत्यू
अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या ड्युटीवर असताना एका कर्मचार्‍याचे निवडणुकीदरम्यान निधन झाले. अशोक सुर्यवंशी असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. सावेडी प्रभागाच्या मतदान केंद्रावर प्रकृती बरी नसल्याने सूर्यवंशी झोपले होते. झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -