आजचा मंगळवार मुंबईकरांसाठी ‘अमंगळ’वार ठरला. कारण सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेत 5 जण जखमी आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर आता पुन्हा एकदा रेल्वे पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पादचारी पूल जीर्णावस्थेत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. पण ‘या तक्रारींकडे रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने कानाडोळा केला,’ असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी रेल्वे अधिकारी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी स्ट्रक्चरल ऑडिटविषयी विचारल्यावर त्यांनी या विषयारवर मौन बाळगणे पसंत केले आहे.
पूल ६० वर्षे जुना
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा गोखले पूल आहे. १९७१ साली मुंबई महापालिकेने हा पूल बांधला. हा पूल रेल्वेला हस्तांतरीत केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. ६० वर्ष जुन्या असलेल्या या पुलाची दुरवस्था झाली होती. या दुरवस्थेसंदर्भात अनेकदा स्थानिकांनी तक्रारदेखील केली होती. आज या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटविषयी पालिका आणि रेल्वेचे अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलायचे टाळले आहे. त्यामुळे आता स्ट्रक्चरल ऑडिटवरुन रेल्वे आणि पालिकेत जुंपली असल्याचं चित्र दिसत आहे. गोखले पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिले चौकशीचे आदेश
रेल्वे मंत्रालयाने गोखले पुलाच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुर्घटनेची जबाबदारी दोघांची आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार पराग अळवणी यांनी दिली आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे भाजप आणि शिवसेना एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. त्यामुळे या भांडणात मुंबई आणि उपनगरातील अन्य जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.