अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डमध्ये उभ्या असलेल्या रिक्षावर अचानक विद्युत वाहिनीसह झाड कोसळल्याने त्याचा शॉक लागून रिक्षाचालक विष्णू राजू सोळंकी याचा जागीच मृत्यू झाला होता. आज त्याच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मिळवून दिली आहे. याबाबत डॉ. किणीकर यांनी ऊर्जामंत्री मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तसेच नैसर्गिक आपत्ती या शीर्षकाखाली मदत मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता. अंबरनाथ तहसीलदार श्री.जयराज देशमुख यांच्याकडेही यासंदर्भात मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने मयत विष्णु सोळंकी यांच्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्ती या शीर्षकाखाली तहसिलदार कार्यालयाकडून ४ लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.
शुक्रवार दि.२८ जून रोजी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँडमध्ये उभ्या असलेल्या रिक्षावर विद्युतवाहिनीसह झाड कोसळल्याने रिक्षा चालक विष्णू राजू सोळंकी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच पाठीमागे बसलेले दोन प्रवासी देखील गंभीररित्या जखमी झाले होते. ही घटना घडून एक तास झाल्यानंतर देखील एम.एस.ई.बी कडून विद्युत पुरवठा खंडित न झाल्याने मयत विष्णु सोळंकी यांना वाचविण्याचे कोणतेच प्रयत्न करता आले नाही.
मयत विष्णू सोळंकी यांच्या संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी हे त्यांच्या वर होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आईवडील, पत्नी आणि १२ महिन्याचा मुलगा आहे.
यामुळे मयत विष्णू राजू सोळंकी यांच्या कुटुंबियांना एम.एस.ई.बी. मार्फत आर्थिक मदत मिळवुन देण्याकरिता महावितरण आणि तहसीलदार कार्यालयाकडे पाठपुरावा करत होते.