हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना बुधवारी घडली. ही आग एका अज्ञात व्यक्तीने पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळे लागली होती. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मात्र ही पहिलीच घटना नाही. गेल्या 9 महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अशा 25 घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकूण ३०० लोकल फेर्या रद्द झाल्या. तर ७५० पेक्षा जास्त लोकल फेर्यांना विलंब झाला आहे. याशिवाय प्रवाशांचे हाल हे झालेच. अशाप्रकारे पेंटाग्राफला जाणूनबुझून आग लावण्याच्या विकृत कृत्यांमुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
सतत होत असलेल्या लोकलमध्ये तात्रिक बिघाडमुळे लोकल विलंबाने धावत असतात. त्यामुळे नेहमी प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करतात. मात्र गेल्या काही महिन्यात विघ्नसंतोषी प्रवाशांकडून रेल्वे रोखण्याच्या घटना वाढल्या आहेत. लोकलच्या पेंटाग्राफवर बॅग, हेडफोन, कपडा, कमरेचा पट्टा आणि इतर वस्तू फेकून त्याला आग लावायच्या घटना सर्वच प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. हार्बर मार्गावरील बुधवारी सकाळी प्रवाशांंची वाट एका बॅगने अडविली.
एका अज्ञात व्यक्तीने वाशी स्थानकात पेंटाग्राफवर बॅग फेकल्यामुळे लोकलची वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या हार्बर रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तर ऐन गर्दीच्या वेळी काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांसोबतच रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अशी कृत्य करणारे विघ्नसंतोषी प्रवासी रेल्वे पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत.
अशा आहेत या 25 घटना
ठाणे = ३ जानेवारी , सँडहर्स्ट रोड = ४ फेब्रुवारी , ठाकुर्ली = १३ फेब्रुवारी, सायन =२५ फेब्रुवारी , ठाकुर्ली= १६ एप्रिल , कांजूरमार्ग = ४ ऑगस्ट, ऐरोली = ५ ऑगस्ट, सँडहर्स्ट रोड = ७ ऑगस्ट, ठाणे = १० सप्टेंनंबर,सँडहर्स्ट रोड = २१ में ,करी रोड = २७ में, कल्याण = १ जून, अंबरनाथ = २२ जून,खोपोली = २९ जून, सायन = 00 माटुंगा=00 आणि वाशी = ९ ऑक्टोबर अशाच्या एकूण मध्य रेल्वेवर 20 घटना घडल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ= 1 जुलै , बोरिवली = 12 जुलै, चर्चगेट= 15 सप्टेंबर , विरार= 19सप्टेंबर,मुंबई सेंट्रल =07 ऑगस्ट एकूण 5 घटना घडल्या आहेत.
आम्ही या घटना टाळण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवतो. सोबतच रेल्वेच्या ब्रिजवर जाळी सुध्दा लावण्याचे काम सुरू आहे. अशाप्रकारे वस्तू फेकून रेल्वेच्या कामात अडथळा निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्याचबरोबर लाखो प्रवाशांना होणार्या विलंबाला आपण कारणीभूत ठरतो हेही लक्षात घ्यायला हवे. शिवाजी सुतार,मुख्य जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे