आज शुक्रवारी पालघर येथून सात बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. भारतात बेकायदेशीररित्या घुसखोरी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशच्या नागरीकांनी कोणत्या कारणासाठी भारतात घुसखोरी केली? याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.
विधेयकावर पाकिस्तान, बांगालादेश नाराज
दरम्यान काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राज्यसभेतसुद्धा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर गुरुवारी रात्री राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झाले आहे. पण या विधेयकावर पाकिस्तान आणि बांगलादेशकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची स्वाक्षरी
बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा रद्द
दरम्यान या पार्श्वभूमिवर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मेमन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. एके अब्दुल मेमन यांचा तीन दिवस भारतात मुक्काम होणार होता. विशेष म्हणजे आज दिल्लीतील सहाव्या ‘इंडियन ओशन डायलॉग’ या कार्यक्रमात ते सहभागी होणार होते. त्याचबरोबर ते भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर देखील चर्चा करणार होते. पण त्यांनी भारत दौरा रद्द केला.
भारताची प्रतिमा कमकुवत होणार – मेमन
राज्यसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री मेमन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “या विधेयकामुळे भारताची धर्मनिरपेक्ष देश म्हणून असलेली ऐतिहासिक प्रतिमा कमकुवत होणार आहे. भारत धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असलेला एका सहिष्णू देश आहे. पण भारत त्या मार्गावरुन विचलित झाल्यास त्यांचे ऐतिहासिक स्थान कमकुवत होईल.”