घरताज्या घडामोडीChandiwal commission: चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुखांना क्लीनचिट ? 200 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना...

Chandiwal commission: चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुखांना क्लीनचिट ? 200 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणी वसुली आणि मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणाचा अहवाल चांदीवाल आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एक सदस्यीय माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेत एक आयोगाची स्थापना करत या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. आयोगाला दोन महिन्यात हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आयोगाच्या विनंतीमुळे अहवाल सादर करण्यासाठी मुदत वाढवून मिळाली होती. अखेर आज मंगळवारी माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी २०१ पानी अहवाल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुपूर्द केला. चौकशीअंती अहवालात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चिट दिली असल्याची माहिती आहे. तसेच अनिल देशमुखांवर झालेले आरोप खोटे असल्याचाही अहवालाचा सूर असल्याचे कळते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक लेटर बॉम्बमधून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून अनिल देशमुख यांनी १०० कोटी रूपये वसुलीचे टार्गेट दिल्याचे परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळेच या आरोपांची समांतर चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या आदेशानंतर चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. मार्च २०२१ मध्ये हा अहवाल स्थापन करण्यात आला होता. या चौकशीच्या निमित्ताने चांदीवाल आयोगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित एपीआय सचिन वाझे, एसीपी संजय पाटील यांच्यासह अनेक गृह विभागातील संबंधित व्यक्तींची साक्ष यानिमित्ताने नोंदवली.

- Advertisement -

चांदीवाल आयोगासमोर एपीआय सचिन वाझे यांनी मी कोणतेही पैसे अनिल देशमुख यांना दिले नसल्याचे जबाबात म्हटले होते. तर आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्याकडे या प्रकरणात कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले होते. तसेच आणखी काहीही सांगायचे नाही असाही जबाब नोंदवला होता. चांदीवाल आयोगाने परमबीर सिंह यांना गैरहजर राहिल्यासाठी दोनवेळा दंडही ठोठावला होता. तसेच गैरहजर राहिल्याने फरारही घोषित केले होते. तसेच जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देशही देण्यात येतील असे आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतरच परमबीर सिंह हे आयोगासमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले. अनिल देशमुख हे एपीआय सचिन वाझे यांच्या माध्यमातून बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटींची वसुली करत असल्याचे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. तसेच अनि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक ही वसुली करत असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या लेटर बॉम्बमध्ये केला होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -