निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री आणि आणि काँग्रेसचे जेष्ठ गुरुदास कामत यांच्या अकाली निधनाने मुंबई काँग्रेसला धक्का बसला आहे. गुरूदास कामत यांचे मुंबईमध्ये त्यातच इशान्य आणि वायव्य मुंबईमध्ये वर्चस्व होते त्यामुळे आता त्यांच्या निधनानंतर या मतदारसंघात आता काँग्रेसकडे गुरुदास कामत यांच्यासारखा तगडा नेता नसल्याने कांग्रेसची चिंता वाढली आहे. आज सकाळी दिल्लीतील प्रिमस रुग्णालयात गुरुदास कामत यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुदास कामत ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ मध्ये निवडणूक जिंकली होती. तर त्यांनी २००९ मध्ये उत्तर-पश्चिम मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कामत त्यांचा शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यानी पराभव केला होता.
घरांघरात पोहोचलेला नेता हरपला
मुंबई काँग्रेस संघटनेवरील गुरुदास कामत यांचा प्रभाव पाहता त्यांनी मुंबईमध्ये आणि विशेषत: ईशान्य आणि उत्तर-पश्चिम मुंबईमध्ये आपला एक दबदबा निर्माण केला होता. कामत यांनी मुंबईत काँग्रेस वाढवली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. आता कामत यांच्या आकस्मिक निधनामुळे आम्हाला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांनी माय महानगरशी बोलताना व्यक्त केली.
आमचा एक ज्येष्ठ सहकारी आमच्यातून असा अचानक निघून जाईल या वृत्तावर अजूनही विश्वास बसत नाही. गुरूदास कामत यांच्या अकाली निधनाने नक्कीच काँग्रेसचे नुकसान झाले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये गुरूदास कामत यांनी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मी त्यांना फार जवळून पाहिले आहे. त्यांच्या स्वभाव अतिशय जिद्दी होता. एखादी गोष्टी त्यांनी हातात घेतली तर ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटायचे नाही. – अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
कामत – निरुपम वाद अनेकदा चव्हाट्यावर
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यामधून विस्तवही जात नव्हता. २०१७ साली मुंबई महापालिका निवडणुकी दरम्यान या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले होते. कामत यांनी यावेळी जाहीरपणे निरुपम यांच्यावर टीका केली होती. उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून ते दूर राहिले होते. दरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे कामत यांनी गेल्यावर्षी सर्व पदांचा राजीनामाही दिला होता.
अधिक वाचा – गुरुदास कामत…एक कुशल संघटक!
कामत गांधी घराण्याच्या सर्वात जवळचे
गुरुदास कामत हे सोनिया गांधी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असल्याने त्यांचा दिल्लीमध्ये एक वेगळा दबदबा होता. त्यामुळे गुरुदास कामत यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोनिया गांधी यांनी दिल्ली येथील प्रायमस रुग्णालयात धाव घेतली. तसेच सोनिया गांधी यांच्या सूचनेप्रमाणे कामत यांचे पार्थिव आधी AICC (काँग्रेसचे दिल्ली येथील कार्यालय) मध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल. कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेता यावे, यासाठी मुंबईत त्यांचे पार्थिव राजीव गांधी भवनमध्ये किंवा कामत यांच्या डीएन नगर मधील कार्यालयात ठेवले जाईल, अशी माहिती सध्या मिळत आहे. तसेच त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जातील, असे कामत यांच्या निकटवर्तीय यांच्याकडून समजते आहे.
गुरुदास कामत यांच्या विषयी थोडक्यात
१९७२ साली विद्यार्थी चळवळीतून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता. १९७६ साली एनएसयुआयचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. १९८४ साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून गेले होते. २००९ ते २०११ मध्ये युपीएच्या कार्यकाळात गृह राज्यमंत्री होते.