आज सलग तिसऱ्या दिवशी ही पावसाने मुंबईला झोडपले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचले असल्याने याचा परिणाम डबेवाल्यांच्या सेवेवर झाला आहे. मुंबई – बोरीवली विरार दरम्यान लोकल ठप्प झाली आहे. यामुळे डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय डबेवाले कार्यकारणीने घेतला आहे. त्यामुळे घरातूनच जेवणाचे डबे घेऊन कामावर जाण्याचा संदेश मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी मुंबईकरांना दिला आहे. मुंबईकरांची भूक भागवणे त्यांच्या ऑफिसला डबे नेऊन पोहोचवण्याचे काम हे मुंबईतील डबेवाले करतात. त्यांच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडत नाही. मात्र, पावसामुळे आणि हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबईतील डबेवाल्यांनी आजचा दिवस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाण्यातून सायकल आणि हातगाडी काढणे कठीण
पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे या पावसाच्या पाण्यातून डबे घेऊन जाण्याची सायकल आणि हातगाडी नेहणे कठीण जाते. त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आज डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेसेवेवर परिणाम
मुंबईतील जोरदार पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने धावत आहे. तर नालासोपारा, वसई आणि विरार भागात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे ठप्प झाली आहे.