महापुरुष आणि पुतळे यांच्याशी लोकप्रतीनिधींना काहीही घेणेदेणे नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंबईत मंत्रालयाशेजारील गार्डनमध्ये महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु या दोन महापुरुषांचे पुतळे आहेत. परंतु, या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था बघता मंत्रालयातच या महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबना होत आहे की काय? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी त्रिपुरा राज्यात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कम्युनिस्ट विचारसणीचे नेते लेनिन यांचा पुतळा पाडला होता. त्यानंतर देशभर पुतळ्यांवर राजकारण पेटले होते. महापुरुषांचे पुतळे विटंबनाची एक वेगळीच मालिका सुरु झाली होती. परंतु, मंत्रालयाशेजारी उभ्या असणाऱ्या दोन महापुरुषांच्या पुतळ्यांची त्याहूनही भयानक परिस्थिती आहे. मंत्रालयाच्या परिसरात असणाऱ्या गार्डनमध्ये महात्मा गांधीच्या आणि नेहरुंच्या पुतळ्यावर पक्ष्यांची विष्टा पडली आहेत. त्याचबरोबर नेहरुंच्या पुतळ्यालगत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पण अशी अवस्था असूनही या पुतळयांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
उद्यानालगत राहत असलेल्या स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्याच दिवशी काही लोकं येतात व थोडीफार साफसफाई करुन पुतळ्यांना हार घालून निघून जातात. त्यानंतर कुठल्याही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या पुतळ्यांकडे फिरकतदेखील नाहीत अशी परिस्थिती आहे.
स्वच्छ भारत अभियानाचे नारे देत सत्तेत आलेल्या भाजपचे मुंबई कार्यालय देखील या पुतळ्यांपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे या पुतळ्यांच्या समोरच अनेक आमदारांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे एवढ्या नेत्यांदेखत महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अशा अनावस्थेकडे नेतेमंडळींचे लक्ष कधी जाईल? हा एक गंभीर प्रश्न आहे. एकीकडे समुद्रामध्ये मोठ स्मारक उभारण्याच्या घोषणा सरकार करत आहे. परंतु दुसरीकडे महापुरुषांच्या स्मरणार्थ उभारलेल्या पुतळ्यांची निगा ठेवण्यातच सरकार अपयशी ठरताना दिसत आहे.