कोणत्याही आजारावर घेण्यात येणार्या अॅण्टिबायोटिक्सच्या अपुर्या डोसमुळे शरीरात निर्माण होणार्या सुपरबग्ज या महाभयंकर विषाणूविरोधात लढा देण्यासाठी भारताना पुढाकार घेतला आहे. अॅण्टिबायोटिक्सच्या अपुर्या व गैरवापरामुळे शरीरात सुपरबग्ज निर्माण होऊन वर्षभरात दरवर्षी तब्बल सात लाखांपेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर पुढील 30 वर्षात हा आकडा एक कोटीच्या घरात जाण्याची शक्यता ज्येष्ठ डॉ. फारूख उडवाडीया यांनी व्यक्त केली.
सुपरबग्जविरोधात भारत आणि इंग्लंड यांनी संयुक्तरित्या सुरू केलेल्या ‘सुपरबग्ज : द इंड ऑफ अॅण्टिबायोटिक्स?’ या जनजागृती मोहीमेच्या प्रदर्शनाचे 17 डिसेंबरला मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही आजारावर डॉक्टरांनी दिलेल्या अॅण्टिबायोटिक्स औषधामुळे आराम पडल्यावर रुग्णांकडून ती घेणे बंद केले जाते. त्यामुळे डॉक्टरने लिहिून दिलेला तीन ते पाच दिवसांचा डोस पूर्ण केला जाता नाही. परिणामी कालांतराने अॅण्टिबायोटिक्सचा आजाराच्या विषाणूंवर कोणताही परिणाम होत नाही. अॅण्टिबायोटिक्सचा अपुर्या डोसमुळे शरीरामध्ये अॅण्टिमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर)तयार होतात.
शरीरात वाढत जाणारे हे एएमआरचे कालांतराने अॅण्टिबॅक्टेरियल रेझिस्टन्समध्ये रुपांतर होऊन सुपरबग्ज या महाभयंकर विषाणू तयार होतो. यावर कोणत्याही अॅण्टिबायोटिक्स औषधाचा परिणाम होत नाही. नागरिकांना असलेली अपुरी माहिती, गैरसमज यामुळे दरवर्षी सुपरबग्जमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सुपरबग्जविरोधात इंग्लंड व भारताने एकत्र येऊन मोहीम हाती घेतली असल्याची माहिती फारुख उडवाडीया यांनी दिली. ‘सुपरबग्ज : द इंड ऑफ अॅण्टिबायोटिक्स?’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पद्मविभूषण शास्त्रज्ञ प्रा. एम.एम. शर्मा, केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, ग्लोबल एंगेजमेंटचे संचालिका हेलेन जोन्स आदी उपस्थित होते.
अॅण्टिबायोटिक्समुळे आजार बरे होत असले तरी त्याच्या अपुर्या वापराचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे. मनात आले म्हणून किंवा मेडिकल स्टोरमधील फार्मासिस्टच्या सल्ल्यानुसार अॅण्टिबायोटिक्स न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे गरजेचे आहे. अॅण्टिबायोटिक्सच्या गैरवापरामुळे निर्माण होणार्या रेझिस्टंन्सवर अॅण्टिबायोटिक्सचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी ‘सुपरबग्ज : द इंड ऑफ अॅण्टिबायोटिक्स?’ हे प्रदर्शन नेहरू सायन्स सेंटरमध्ये भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 17 डिसेंबरपासून दोन महिने मुंबईमध्ये होणार असल्याची माहिती नेहरू सायन्स सेंटरचे संचालक शिवप्रसाद खेणेद यांनी दिली.
चार मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शन
मुंबईमध्ये सुरू असलेल्या ‘सुपरबग्ज : द इंड ऑफ अॅण्टिबायोटिक्स?’ या प्रदर्शनानंतर ते बंगळूर, कोलकाता या शहरांमध्ये होणार आहे. त्यापूर्वी ते दिल्ली येथे सप्टेंबरमध्ये झाले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
1200 शाळांशी संपर्क
सुपरबग्ज या महाभयंकर विषाणूची माहिती विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना व्हावी यासाठी या प्रदर्शनासाठी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील 1200 शाळांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना याची माहिती व्हावी यासाठी विविध ठिकाणी पथनाट्य, नाटक यामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागासाठी मोबाईल व्हॅनचा विचार
‘सुपरबग्ज : द इंड ऑफ अॅण्टिबायोटिक्स?’ या प्रदर्शनामार्फत अॅण्टिबायोटिक्स रेझिस्टंन्सची माहिती चार मोठ्या शहरांमध्ये प्रचार करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागामध्येही याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आम्ही मोबाईल सायन्स व्हॅनच्या पर्यायाचा विचार करत आहोत. व्हॅनमध्ये प्रदर्शन बसवणे शक्य झाल्यास भविष्यात मोबाईल व्हॅनचा वापर करण्यात येईल अशी माहिती शिवप्रसाद खेणेद यांनी दिली.