तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सुरु असणार्या प्रथम वर्ष तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी दुसर्यांदा मुदत वाढविण्यात आली आहे. 3 जुलैअखेर अर्ज करण्याची मुदत असून 8 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा प्रथमच दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच 30 मे पासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. मात्र विद्यार्थी प्रवेशासाठी येईनात अशी अवस्था आहे. केवळ 55 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. प्रत्यक्षात 19 जून अखेर संपणार्या प्रवेश प्रक्रियेला 26 जून अखेर पहिल्यांदा वाढ देण्यात आली होती. संचालनालयाने याबाबतच माहिती परिपत्रकातून जाहीर केली. 4 जुलैला कच्ची गुणवत्ता यादी जाहीर होईल.
यावर आक्षेप घेण्यासाठी 6 जुलै अखेर दोन दिवसांची मुदत आहे. 8 जुलैला पक्की यादी जाहीर होईल. त्यानंतर होणार्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संचालनालयातर्फे जाहीर होणार आहे. यावर्षी दहावीचा निकाल कमी लागला आहे. त्यामुळे अर्ज येणार्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया संथच सुुरु होती. संचालनालयाने प्रवेशासाठी मार्कशीट आणि एलसीची आवश्यकता नसल्याचे जाहीर करुनही प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला नाही. याला मुख्यतः प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले वेळेत विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने आडकाठी आली. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखलाही मिळण्यात अडचणी असल्याच्या लक्षात घेवून संचालनालयाने मुदतवाढ केली आहे.
विद्यार्थी कमी प्रवेशामुळे यंदा शासकीय अनुदानित महाविद्यालयातीलच जागा शिल्लक राहण्याचे यंदा प्रमाण अधिक असण्याचीही शक्यता आहे. राज्यात एक लाखाहून अधिक जागा असूनही आतापर्यंत निम्याहूनही अर्ज दाखल झालेले नाहीत अशी परिस्थिती असल्याने या मुदतवाढीचा तरी फायदा होतो का हे आता पहावे लागणार आहे.