ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनदरम्यान एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. माया (टी-१२) नावाच्या वाघिणीने ५ पिल्लांना जन्म दिला असून ही पिल्लं ३ महिन्यांची झाली असून सुखरूप असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने कळविले असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
कोरोनाचा गंभीर परिणाम सर्वच क्षेत्राला बसला असून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पावरही झाला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून हा प्रकल्प बंद असल्याने व्याघ्र पर्यटन पूर्णत: बंद आहे. ताडोबाची ऑनलाईन व्याघ्र सफारी आणि ताडोबाचे संरक्षण सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताडोबा हे वाघिणीचा मृत्यू आणि मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण करणारा वाघ जेरबंद झाल्याच्या घटनेने चर्चेत असतानाच लॉकडाऊनदरम्यान ताडोबातील प्रसिध्द वाघीण माया हिने ५ पिल्लांना जन्म दिला असल्याची गुड न्यूज समोर आली आहे.
ताडोबातील एका कर्मचाऱ्याला माया ही वाघीण तिच्या ५ पिल्लांसोबत दिसली. त्याने ही माहिती ताडोबा व्यवस्थापनाला दिली. तेव्हापासून माया या वाघिणीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. क्षेत्र संचालक प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार माया वाघीण व तिचे पाचही पिल्लं अतिशय सुरक्षित आहेत.
दरम्यान, भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन २४ मार्च रोजी जाहीर झाला. त्याच दरम्यान माया वाघिणीने या पिल्लांना जन्म दिला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असल्याचे सांगितले जात आहे.