राज्यात अवकाळी पावसाचं संकट आल्यानंतर नागरिकांना आता उन्हाच्या कडाक्याच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. कारण मुंबईसह राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. दरम्यान वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कडाक्याच्या थंडीनंतर आता नागरिकांना उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ वेधशाळेने सकाळी ११.३० वाजता नोंदवलेली तापमान ३५.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले होते. मात्र आता त्या तापमानात वाढ होऊन ते ३७ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यासह फेब्रुवारी महिन्यातील हा शेवटचा रविवार आणि हिवाळ्यातील एक उबदार दिवस आज अधिकृतपणे संपत असून कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
Hot Sunday🔥 in Mumbai !
Mumbai at 11.30 am temp recorded by Santacruz Met observatory is 35.4°C and now as seen from AWS Santacruz temp graph, it has reached as high as ~37°C.
A very warm Sunday as winter is ending today 28 Feb officially and Summer already showing up.
Tk Care pic.twitter.com/i76wG2D4vG— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 28, 2021
गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक शहरांचे कमाल तापमान हे ३६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले असून किमान तापमानाची नोंद १६ अंशांच्या असपास असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे वातावरणात होत असलेल्या बदलांचा नागरिकांना चांगलाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी दिवस हे नागरिकांना घाम फोडणारे असू शकतात. दरम्यान, हवामान खात्याकडून करण्यात आलेल्या नोंदीनुसार, ३७ अंश सेल्सिअस तापमान असल्याने राज्यातील हिवाळा हा ऋतू परतीच्या प्रवासास निघाला आहे.
मुंबई हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यभरात कमाल तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तर आज रविवारी मुंबईत ३७ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास मुंबईकरांना उन्हाची झळ सोसावी लागणार असून नागरिकांना या उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या, असेही अवाहन मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी केले आहे.