घरमुंबईमातोश्री सेवेची फलश्रुती; शिंदे, अहिर, नार्वेकरांना परिषदेचे वेध!

मातोश्री सेवेची फलश्रुती; शिंदे, अहिर, नार्वेकरांना परिषदेचे वेध!

Subscribe

विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्तीने जाणाऱ्या बारा सदस्यांमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांकडून आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यापैकी प्रत्येकाच्या वाट्याला चार- चार जागा येणार असून सगळ्यात जोरदार स्पर्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. त्यात सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यासह मिलींद नार्वेकर, सूरज चव्हाण, अर्जुन डांगळे यांच्या नावांचीही चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपला हुकमी मतदार संघ सोडून देऊन सुनिल शिंदे यांनी ठाकरे परिवारातील पहिल्या ठाकरेंना विधिमंडळात जाण्यासाठी वाट मोकळी करुन दिली. सुनिल शिंदे यांना आपली जागा सोडावी लागली ही गोष्ट सामान्य कार्यकर्त्यांच्या फारच जिव्हारी लागली होती. मात्र ‘मातोश्री’ शिंदेंचा यथोचित सन्मान करेल असं आश्वासन स्थानिक शिवसैनिकांना निवडणुकीवेळी देण्यात आलं होतं. मात्र आदित्य ठाकरे आमदार झाल्यावर वरळीतल्या ‘भाऊ गर्दीत’ शिंदे मागे पडत असल्यानं सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता आहे. यातून वाट काढण्यासाठी आदित्य यांच्यासाठी विधानसभेचा त्याग करणाऱ्या शिंदे यांना यादीत पहिली पसंती आहे. तर वरळी विधानसभेत शिंदे यांच्याकडून पराभूत झालेले सचिन अहिर हे आदित्य यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनाही आमदारकीचे जोरदार वेध लागले आहेत.

आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या अहिर यांची वर्णी युवासेना प्रमुखांच्या कोट्यातून लागू शकते. पण त्याचवेळी सूरज चव्हाण किंवा राहुल कनाल यांच्या नावाचे वारेही युवासेनेत वाहताना दिसत आहेत. यापैकी सेनेतील अनेक पदाधिकारी- नेते सूरज चव्हाण यांच्या पारड्यात आपलं मत टाकत आहेत. शांत, संयमी स्वभाव, आदित्य निष्ठा, तंत्रप्रेमी, सामान्य शिवसैनिक ह्या चव्हाण यांच्या जमेच्या बाजू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मैत्री व्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिक राहुल कनाल यांचं पक्षात विशेष काही योगदान नाही. आदित्य यांच्या आग्रहाखातर याआधी प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभा देण्यात आली आहे. आता विधानपरिषदेत पुन्हा तोच प्रकार झाल्यास पक्षांतर्गत नाराजी वाढू शकते. त्यामुळे चार पैकी एक जागा आदित्य यांच्या मर्जीसाठी राखीव असेल. त्यात आहिर, चव्हाण, कनाल यापैकी कोण बाजी मारणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

शिवसेनेसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे ती मुख्यमंत्री ठाकरे याचे खासगी सचिव, पक्ष सचिव आणि ओएसडी मिलींद नार्वेकर यांच्या नावाची. गेल्या २५ वर्षात आपल्या हातून अनेकांना एबी फॉर्म वितरित करणाऱ्या नार्वेकर यांची यंदा तरी वर्णी लागते का हा औत्सुक्याचा विषय आहे. उद्धव ठाकरे यांना ‘हिरो’ बनवताना स्वत: खलनायक ठरलेल्या नार्वेकर यांना याआधीच संधी मिळायला हवी होती असं सेनेच्या निरीक्षकांचं म्हणणं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘गुडबुक’ मध्ये भाजपाच्या नेत्यांइतकंच स्थान मिळवण्याचं कसब नार्वेकर यांनी गेल्या काही काळात दाखवलं आहे. त्याचा थेट फायदा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापासून पक्षाच्या अनेक कामात झाला आहे. काही वैयक्तिक निकटवर्तीयांच्या भेटी-गाठी घेतांनाही कोश्यारी यांनी नार्वेकर यांना सोबत ठेवण्याच्या प्रकाराने तर बडे भाजप नेते बुचकळ्यात पडले आहेत. आता राज्यपाल नियुक्तांच्या यादीतून ते परिषदेत जाणार की पुन्हा ‘वेटिंग’ मध्ये राहणार हाच प्रश्न आहे. आदित्य यांच्याशी सूर जुळवणं जड असल्यानं नार्वेकरांना आमदार करुन अलगद वेगळ्या वाटेने जाऊ देण्याची रणनीती ‘मातोश्री’ याचवेळी अवलंबून घेईल. त्यासाठी नार्वेकर यांच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वावराचा आधार क्रीडासंघटक म्हणून घेण्याचाही विचार सुरु करण्यात आला आहे.

या प्रमुख नावाबरोबरच रामदास आठवले यांना सोडून आलेले दलित कवी, साहित्यिक आणि सोशल इंजिनिअरिंगचे अभ्यासक अर्जुन डांगळे, साताऱ्याचे शिवव्याख्याते नितीन बानगुडे- पाटील, रावसाहेब दानवेंचे विरोधक अर्जुन खोतकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. यापैकी डांगळेंच्या रुपाने दलित चेहरा देऊन त्यांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न विशेषत: ग्रामीण भागासाठी करण्यात येणार आहे. तर शिवव्याख्याते नितीन बानगुडे- पाटील यांना संधी देऊन साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात सेना डरकाळी फोडण्याच्या प्रयत्नांना लागली आहे.

- Advertisement -

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना विधान परिषदेत पाठवण्याचा शब्द मागच्या दोन विधानसभांपासून पक्षप्रमुखांकडून दिला जातोय. त्यांच्यासाठी नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आग्रही आहेत. म्हस्के सध्या ठाण्याचे महापौर आहेत. ही सबब पुढे करण्यात आली आहे. त्यावर विधानपरिषदेत जाण्यासाठी ठाण्याचे महापौरपद सोडायलाही ते तयार असल्यांचं खात्रीलायक वृत्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -