मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती महामोर्चाच्यावतीने २ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण सुरु आहे. आझाद मैदानावर सुरु असलेल्या या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची प्रकृती खालावत आहे. तरी देखील सरकारने अजूनही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. मात्र आज राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
योग्य निर्णय घेऊ
उपोषकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी दिले. त्याचसोबत मराठा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन देशमुख यांनी दिले.
काय आहे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
१) कोपर्डी खटल्यातील आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी.
२) मराठा आरक्षण जाहीर करून लागू करावे.
३) मराठा आंदोलकांची धरपकड थांबवावी आणि गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
४) आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला १० लाखआंची आर्थिक मदत करून एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी
५) सारथी संस्थेच्या अध्यक्षपदावरून सदानंद मोरे यांना हटवून त्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच आयुक्तांची नेमणूक करावी
६) अॅट्रॉसिटीच्या कायद्यात दुरुस्ती व्हावी
७) मागास आयोगाचा अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबरला असल्याने येत्या अधिवेशनात ठराव मंजूर करुन केंद्राकडे पाठवा.
१६ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन
या सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या १६ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व मराठा समााज मुंबईत येऊन मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि आझाद मैदानात आंदोलन करतील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिली आहे. त्याचसोबत मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचे काम मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.