करोनाच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रादुर्भावामुळे लोकांनी मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे. शिवाय, करोनाचा प्रसार रोखता यावा यासाठी सरकारकडून संचारबंदी ही लावण्यात आली आहे. पण, जे डॉक्टर्स या करोनाबाबतचे उपचार देत आहेत त्याच डॉक्टरांना वेगवगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात एक धक्कादायक बाब म्हणजे कस्तुरबा आणि विमानतळावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांपैकी ५ डॉक्टर्स करोना संशयित असल्याचे सांगण्यात आले आहे.
मार्डकडून मुख्यमंत्र्यांना पत्र
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसाठी मास्क आणि पीपीई किट्स उपल्ब्ध असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितले जात असताना केंद्रीय मार्ड संघटनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हॉस्पिटलमधील तुटवडा आणि डॉक्टरांच्या समस्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.
एका मास्कचा चार दिवस वापर
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, पीपीई किट्स आणि उपलब्ध नसलेल्या मास्क याबद्दल सांगण्यात आले आहे. शिवाय, उपचार करणारे डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी एकच मास्क तीन ते चार दिवस वापरत आहेत. तसेच अनेक हॉस्पिटल हे या तुटवड्याचा सामना करत आहेत. शिवाय जे डॉक्टर्स कस्तुरबा हॉस्पिटल आणि विमानतळावर कार्यरत होते त्यापैकी काही डॉक्टर ही करोना संशयित आहेत.
५ डॉक्टर करोना संशयित
आतापर्यंत ५ डॉक्टर करोना संशयित असल्याची माहिती केंद्रीय मार्ड सल्लागार सदस्य डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली आहे. शिवाय त्यांचे रिपोर्ट आज रात्री पर्यंत येणार आहेत. शिवाय काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना जेवणाच्या समस्येला ही सामोर जावे लागत आहे. त्यामुळे या गोष्टींसह हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मास्क आणि सुरक्षेचे सर्व साहित्य पुरवावे जेणेकरून डॉक्टर्स आणखी चांगली सेवा देऊ शकतील. दरम्यान, राज्यातली सध्याची संख्या १०६ वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! ‘करोना’ पाठोपाठ चीनमध्ये नवा व्हायरस; एकाचा मृत्यू