शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यामुळे भाजपाकडून शिवसेनेवर सातत्याने टीका केली जातेय. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील शिवसेनेला टार्गेट करण्यात आलेय. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असलेल्या सरकारकडे इच्छशक्ती नाही असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले. मात्र या ठीकेला आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. “भाजपाकडून स्क्रीप्ट लिहून जाते नाहीतर अमित ठाकरे सुसंस्कृत आहेत” अशा शब्दात महापौरांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आज मुंबईत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, अमित ठाकरे राजकीय प्रवासात थोडे लहान आहेत. भाजपाकडून स्क्रीप्ट लिहून दिली जाते. नाहीतर अमित ठाकरे सुसंस्कृत आहेत. ते अशा पद्धतीने रिअॅक्ट होणार नाहीत. असं म्हणत भाजपावर टीका केली.
“मुंबईला नकारात्मक विचारांनी प्रेरित करतायत”
“राज्यात जर सत्ता गेली तरी बाय हूक आणि बाय क्रूक आम्ही ती मिळवू अशी त्यांना स्वप्न पडतायत आणि त्यापद्धतीने मुंबईला नकारात्मक विचारांनी प्रेरित केले जातेय. पण मला वाटते मुंबईकर सुजाण आहेत. सजग आहेत, मुंबईकर नेहमी प्रॅक्टिकल, मुंबईकर नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात. मुंबईकर कुठल्याही प्रसंगाला कितक्यापूर्ती थांबून पुढचा प्रवास करतात. त्यामुळे अशा नकारात्मक विचारांना मुंबईकर भुलणारे नाहीत. असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
“राजकीय लोकांच्या विचारांचे अधनपतन होतेय”
“धमकीचे पत्र येणे हे कोणालाही व्यथित करणार आहे. मी दुसऱ्याच दिवशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मी नक्की असे म्हणेण की हा कोणी तरी क्रूरकर्मचं असावा. राजकीय लोकांच्या विचारांचे अधनपतन होताना पाहतोय. त्या विचारांचा एक आधार घेत हे पत्र पाठवण्याचे धाडस केले. हे धाडस माझे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस ,संविधान आणि कायद्याने दिलेला अधिकार याच नक्की वापर होणार जो कोणी आहे तो आपल्या समोर येईल.” असंही महापौर म्हणाल्या.
“ओमिक्रॉन भयंकर विषाणू नाही”
ओमिक्रॉन विषाणू आत्ताच्या घडीला भयंकर विषाणू नाही. घाबरण्याची गरज नाही पण काळजी घेण्याची गरज आहे. आजूबाजूला आलेल्या लोकांबाबत नागरिकांनी सजग असणे गरजेचे आहे. ती माहिती महापालिका आणि मुंबई पोलिसांना दिली पाहिजे. त्रिसुत्री कार्यक्रमाचे पालन करावे. असं आवाहन यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.