जगभरात करोना व्हायरसने कहर केला आहे. जगातील १९५ देशांपैकी १५० देशांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असून या वेळेपर्यंत एकूण ८ हजार ९२८ मृत्यू यामुळे झाले आहेत. भारतातही १५१ लोकांना करोनाची लागण झाली असून सर्वाधिक ४७ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर आता आखाती देशामधून २६ हजार भारतीय नागरिक मुंबईत दाखल होणार आहेत. गुरुवार ते ३१ मार्चपर्यंत हे लोक मुंबईत येणार असून त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी मुंबई महानगरपालिकेने सुरु केली आहे. आखाती देशातील कुवैत, कतार, ओमान आणि युएई असा देशामधून हे लोक येणार असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या संकतेस्थळाने दिली आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आखाती देशांमधून दररोज २३ विमाने मुंबईत येणार आहेत. १८ मार्च पासून याची सुरुवात झाली असून आखाती देशांमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला १४ दिवस अलगीकरण करुन ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने २६ हजार भारतीयांच्या मुक्कामाची तयारी सुरु केली आहे.
आखाती देशातून येणाऱ्या या नागरिकांना विविध गटात विभागले जाणार आहे. जे लोक निरोगी आणि मुंबईत राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरीच अलगीकरन करुन ठेवणार आहेत. तसेच मुंबईच्या आसपास म्हणजेच पुणे आणि नाशिक येथे राहणारे आणि ज्यांना कमी धोका आहे, अशा लोकांनाही घरीच १४ दिवसांसाठी ठेवले जाईल, मात्र त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरता येणार नाही, त्यांना खासगी वाहनाने नेण्यात येणार आहे. जे लोक दूर राहतात त्यांची पवई आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.