महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चा निकाल लागून १३ दिवस झाले. मात्र अद्याप सत्ता स्थापना झालेली नाही. सत्तेतील वाट्यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही पक्ष अडून बसले आहेत. यातच मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शिवसेनेची बाजू लावून धरली आहे. “मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय झाल्यानंतरच विधानसभा निवडणुकीसाठीच्या युतीचा निर्णय झाला होता. त्यामुळे आता कोणत्याही नव्या प्रस्तावावर चर्चा होणार नाही”, असे संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी ठाम असल्याची भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
Sanjay Raut, Shiv Sena, in Mumbai:We'll only have discussions on the proposal that we had agreed on before the assembly polls. No new proposals will be exchanged now. BJP&Shiv Sena had an agreement on post of CM before elections&then only we moved ahead for alliance for elections pic.twitter.com/KC0aUUclvt
— ANI (@ANI) November 6, 2019
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना आणि भाजपमध्ये यापूर्वी जे ठरले आहे, तोच शिवसेनेचा प्रस्ताव आहे. शिवसेना आता कोणत्याही नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ते बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपची नव्याने चर्चा करण्याची ऑफर साफ धुडकावून लावली. जे ठरलंय तोच शिवसेनेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न झाला तर तो जनमताचा अनादर ठरेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.