मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरावर ओढावलेल्या कोरोनाच्या महामारीच्या संकटानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीचा बुस्टर म्हणून आजच्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांच्या नजरा लागल्या होत्या. आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावरून भाजपने जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प फसवा असून मुंबईकरांना केवळ स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. पालिकेत आज अर्थसंकल्प सादर करत मुंबईकरांना स्वप्न दाखवली. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी कुठून आणणार? असा सवाल देखील प्रभाकर शिंदे यांनी केला.
स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प
पालिकेच्या आयुक्तांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो फसवा आहे. हा अर्थसंकल्प केवळ विकासाची स्वप्न दाखवणारा आहे. विकास करण्यासाठी पैसे कुठून आणणार याचे प्रतिपादन केलं नाही. सरकारकडे जवळपास ५ हजार कोटी थकबाकी आहे ती कशी मिळवायची? हे या अर्थसंकल्पात सांगितलेलं नाही किंवा याबाबत स्थायी समितीने काही उपाय योजना केल्या नाहीत. हा अर्थसंकल्प आकड्यांची फिरवाफिरव करणारा अर्थसंकल्प आहे.
मुंबईचं बजेट कमी आणि वरळीचं बजेट जास्त
हा अर्थसंकल्प मुंबईचं बजेट कमी आणि वरळीचं बजेट जास्त असा दिसत आहे. पालक मंत्री युवराज यांच्या मतदार संघात अनेक कामांसाठी निधी मंजूर झाला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते व माजी आमदार राजहंस सिंग यांनी केली. कोरोनाच्या काळात देखील शिवसेना आपला फायदा बघत आहे. मुंबई शहराला काय दिल ते एकदा आम्हाला सांगावं, असा सवाल देखील राजहंस यांनी केला आहे.