शहापूर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. सेनाभवन येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या कार्यक्रमा्त माजी आमदार बरोरा यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधले. यावेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सेना नेते हजर होते. राष्ट्रवादीकडून आमदारकी मिळविलेल्या बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा मंगळवारी सुपुर्द केला.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शहापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश. काल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. #ShivSena #NCP #MyMahanagar @NCPspeaks @ShivsenaComms pic.twitter.com/yYH8l1TLVk
— My Mahanagar (@mymahanagar) July 10, 2019
बरोरा हे राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपा अथवा शिवसेना पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती गेल्या काही वर्षांपासून बरोरा हे शिवसेना नेते ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते अखेर शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेच्या गळाला लावले आमदार बरोरा यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला शहापूर तालुक्यात खिंडार पडले असून हा जबर धक्का राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे. पुढील काळात शहापूरची राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
शहापूर तालुका टंचाई मुक्त आणि भगवामय करण्यासाठी मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचा भगवा शहापूरमध्येच नाही, तर ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे तिकडे भगवा फडकवू – पांडूरंग बरोरा, माजी आमदार
शहापूरमध्ये विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला
चांगली सुरुवात झाली आहे असे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की आषाढीची पंढरपूर वारी सुरू आहे. सगळे पंढरपूरमध्ये चाललेत. हे पांडुरंग आज शिवसेनेत आले. निवडणूक आल्यानंतर या पक्षातून त्या पक्षात लोक जातात पण ही लोकं कोणतंही प्रलोभन न दाखवता येत आहेत. सगळे आपले मतदार आहेत. पाणी तुमच्या इथून मुंबईत येत पण तुमच्या तालुक्याला जात नाही. पण तुम्ही ज्या विश्वासाने आलात त्याला तडा आम्ही जाऊ देणार नाही. ठाणे जिल्हा आपला नुसता बालेकिल्ला नाही तर अभेद्य असा बालेकिल्ला आहे. तुमचं घराणं काँग्रेसचे पण आज तुम्ही शिवसेनेते आलात. तुमच्या मनात तळमळ होती तुमच्या तालुक्याच्या विकासाची पण तिथे तुम्हाला न्याय मिळत नव्हता म्हणून तुम्ही आज शिवसेनेत प्रवेश केला असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.