घरमुंबईठाणे शहर म्हणजे ९४७ खड्ड्यांची 'स्मार्ट सिटी'!

ठाणे शहर म्हणजे ९४७ खड्ड्यांची ‘स्मार्ट सिटी’!

Subscribe

कल्याणमध्ये पाच जणांचा खड्डेबळी गेल्यानंतर आता सगळ्याच महानगरपालिकांवर टीका होत आहे. ठाणे शहर स्मार्टसिटीच्या यादीत असतानादेखील सर्वेमध्ये शहरात तब्बल ९४७ खड्डे असल्याचे समोर आले आहे. हे खड्डे त्वरीत बुजवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनचालकांना गाडी चालवणेही कठीण होत आहे. तर कल्याण-डोंबिवलीसारख्या ठिकाणी या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे हा विषय सध्या सर्वत्र चर्चेचा ठरला आहे. अशातच आता ठाणे शहरात पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा पुढे येऊ लागला आहे. मुसळधार पावसामुळे स्मार्टसिटीच्या यादीत असलेल्या ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या रस्ते खड्डेमय झाले आहेत. टक्केवारीच्या अर्थकारणामुळेच ठाण्यातील रस्ते खड्ड्यात गेले असल्याचा आरोप ठाणेकरांनी केल्यानंतर ठाणे महापालिकेने लागलीच खड्ड्यांचा सर्व्हे केला आहे. विशेष म्हणजे या सर्व्हेत खड्ड्यांची संख्या ९४७ असल्याची माहिती समोर आलीआहे. आणि या खड्ड्यांमुळे ठाणे महापालिका मात्र टिकेची धनी ठरत आहे.
Thane Potholes
ठाण्यात रस्ते कमी, खड्डेच जास्त!
ठाण्यात सर्वाधिक खड्डे हे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये आहेत. माजिवडा मानपाड्याच्या परिसरात जवळपास १९० खड्डे आहेत. त्यानंतर वर्तकनगर परिसरात १६५ तर दिवा परिसरात १३५ खड्ड्यांची संख्या आहे. विशेष म्हणजे शहरात जरी खड्ड्यांचे क्षेत्रफळ कमी असले, तरी दिवा परिसरात मात्र ६ हजार ३९४ चौरस मीटरचे खड्डे पडले असल्याचे या सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत ६५४ खड्डे बुजवण्यात आले असल्याचा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
    प्रभाग                            खड्ड्यांची संख्या            न बुजवलेल्या खड्ड्यांची संख्या
कोपरी नौपाडा                            ८९                                                ३३
 उथळसर                                 ६०                                                १२
 दिवा                                      १३५                                              ३८
 मुंब्रा                                       ९६                                              ५१
 कळवा                                    ३९                                               १९
 माजिवडा मानपाडा                      १९०                                              ६२
 वर्तक नगर                               १६५                                              २५
 लोकमान्य सावरकर नगर               ९३                                                 ३५
 वागळे                                    ८०                                                १६
रस्त्यांच्या दुरवस्थेला संबंधित महापालिकाच जबाबदार असून यामुळे जर अपघात झाला आणि जीवित हानी वा वाहनांचे नुकसान झाले तर त्याला महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनाच जबाबदार धरले जावे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय यापुढे पर्याय नाही. अन्यथा पावसाळा गेल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार यापुढे होऊ देता कामा नये.
– मनिष वाघ (पर्यावरण दक्षता समिती सदस्य
ठाणे महापालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये द्रुतगती मार्गावरील खड्ड्यांचा सर्व्हे करण्यात आला नसून केवळ ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील खड्डे मोजण्यात आले आहेत. शहरात अजूनही २८९ खड्डे असून ते बुजवण्याच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. ब्रिक्स अँड सॅण्ड मिश्चर सारख्या अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून हे खड्डे बुजवण्याचे काम सुरु असल्याची माहिती ठाणे महानगर पालिका शहर अभियंता अनिल पाटील यांनी दिली आहे.
ठाण्यात पहिल्यांदाच सिरॅमिक केमिकलच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम  सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी रेडिमिक्सच्या माध्यमातून खड्डे बुजविले जातील. पुढील आठ ते दहा दिवसांत ठाण्यातील खड्डे बुजवण्यात येतील.                                                              – एकनाथ शिंदे, पालकमंत्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -