काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी बरसल्या असून त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक भागात राहणाऱ्यांचे नुकसानही केले होते. मात्र तो मान्सूनचा पाऊस नसून त्यापूर्वी चक्रीवादळामुळे आलेला पाऊस होता. मात्र आता पावसाला पुन्हा सुरूवात झाली असून हे मान्सूनच्या पावसाचे आगमन असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दुपारी काही काळच बरसलेल्या पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जाणाऱ्या गाड्या धिम्या गतीने चालू लागल्या. तर एस. व्ही. रोडवरही एका बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
अनलॉकमुळे नागरिकांच्या गाड्या रस्त्यावर
मुंबईतील, अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे प्रवासासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेले शहर आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ८ जूनपासून खासगी कार्यालये सुरू करण्यात आली असून त्यामुळे अनेक नागरीक आता घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असून बससेवाही मर्यादित स्वरूपात असल्याचे लोकांनी स्वतःची खासगी वाहने रस्त्यावर उतरवली आहेत. त्यामुळे आता हायवेवर वाहतूक कोंडी होत आहे.