मेरा बाबा देश चलाता है. अगर नही जाएगा मेरा बाबा काम पर, तो रूक जाएगा इंडिया का घर. कोणात्याही वडिलांना आवडणार नाही अस काम माझे बाबा करतात. माझे बाबा गटारात उतरतात, कचरापेटीत काम करतात आणि आजारांच संकट असतानाही काम करत राहतात, त्यासाठी कारण एकच असत ते म्हणजे लोक ओला आणि सुका कचरा वेगळा न करताच टाकतात. ही भावनिक साद घातलेय एका सफाई कामगारांच्या मुलाने. याचीच दखल घेऊन टाटा ट्रस्टने मिशन गरीमा या सफाई कामगारांसाठीचा पुढाकार घेतला आहे. खुद्द रतन टाटा यांनीही मुंबईकरांना एका इंस्टाग्राम व्हिडिओतून भावनिक आवाहन केले आहे.
अनेकदा मनात राहून राहून वाटत या सगळ्या घाणीच्या रोगराईतून मी माझ्या वडिलांना तर गमावणार नाही ना ? एका मुलाने आपल्या वडिलांच्या कामाबाबत व्यक्त झाल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे खुद्द रतन टाटा यांनी. हा व्हिडिओ म्हणजे टाटा ट्रस्टच्या पुढाकाराअंतर्गत मिशन गरीमाचा भाग आहे. हाताने मैला आणि कचरा उचलणाऱ्या कामगारांच्या आयुष्यात सुधारणेसाठीचा हा पुढाकार आहे. स्वच्छतेचे काम करणाऱ्या आपल्या धाडसी कामगारांसाठी मिशन गरीमा हा पुढाकार असल्याचे रतन टाटा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना नमुद केले आहे.
मुंबईत एकुण २ कोटी ३० लाख रहिवासी आहेत. त्यापैकी ५० हजार लोक हे स्वच्छतेचे काम करतात. प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी आव्हानाच असतो. मिशन गरीमाच्या माध्यमातून सुरक्षित, स्वच्छ आणि कामासाठी योग्य अशा वातावरणाची निर्मिती करण्याचा प्रय़त्न असणार आहे. आपल्यााला शहर एरव्ही जे स्वच्छ दिसत ते अशाच लोकांच्या योगदानातून आहे हे विसरता कामा नये असेही टाटा यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून नमुद केले आहे.
इंस्ट्राग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी #TwoBinsLifeWins हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे स्वच्छता कामगारांसाठी आवाहन करणारा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर एक लाखांहूनही अधिक लोकांनी पाहिला आहे. आपण आपल्या जबाबदाऱ्यांसाठी आणखी काळजीने वागायला हवं.