सुमारे 25 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने करावी लागली. त्यानंतर शासनाला जाग आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे आरक्षण लागू केले. मात्र या आरक्षणाला राज्यातील काही सामाजिक शत्रू बाधा घालण्याच्या प्रयत्नात आहेत. न्यायालयात याचिका दाखल करून आरक्षणाला बाधा आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्यांनी अशी काही कृत्ये करू नये ज्यामुळे सामाजिक सलोखा बिघडेल, अन्यथा मराठा समाज याला जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे. असे जाहीर आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात देण्यात आले आहे. आज रविवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित वार्तालाप आणि आभार कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांच्यासह विनोद बाबर, सुनिल तागवे, सुभाष एरंडे, ज्ञानेश्वर कवडे, दिपक ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
इतर समाजाच्या आरक्षणाला बाधा न आणता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आग्रही होता. आणि त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. मात्र, काही राजकारणी मंडळी या बाबत गैरसमज पसरवत असून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भविष्यात यावरून काही अघटीत घडले तर याला जबाबदार हीच मंडळी राहणार आहेत, असे यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या आरक्षणाविरोधात कोणीही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पडू नये. आरक्षणाबाबत काही शंका असल्यास त्या मंत्रीमंडळाला विचाराव्यात. या प्रक्रियेमध्ये सर्व समाजातील आमदार सहभागी होते. त्यांनी हे आरक्षण पारित केले आहे. त्यामुळे भविष्यात या विरोधात कोणी न्यायालयात याचिका दाखल केली. तर त्याच्या होणार्या परिणामाला ते व्यक्तीश: अथवा ती संघटना जबाबदार असतील. आम्ही कोणत्या समाजाला वेठीस धरणार नाही. आम्ही कोणाच्या कोट्यातील आरक्षण घेतलेले नाही. आम्ही स्वतंत्र आरक्षण मिळवलेले आहे. त्याचा आता तरी आम्हाला लाभ घेऊ द्या. अन्यथा हा मराठा पेटला तर पुन्हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही.
– आबासाहेब पाटील
मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य समन्वयक