राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर भाजप सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाध साधत आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवारांनी ही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जर ते हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती, असे ते म्हणाले.
गेल्या काही काळापासून राष्ट्रपती हे सत्ताधारी पक्षातले नेमले जातात. गेल्या काही काळात स्वतत्र्यपणे काम करणारे राष्ट्रपती कमी मिळाले आहेत. आता सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांचे, त्यांच्या हो ला हो म्हणणारे नवीन राष्ट्रपती घेऊन येतील. सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा या देशातील विरोधी पक्ष नेत्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही एक प्रक्रिया असते. सगळ्या देशाला मान्य होईल अशा प्रकारची व्यक्ती तिथे बसायला हवी. पण सत्ताधारी पक्षातील एक नेता तिथे पाठवला जातो आणि तो कार्यकर्ता म्हणून बसतो. पण तरीही सगळ्यांना मान्य होईल असे नाव आले तर त्यावर चर्चा, होईल असे संजय राऊत म्हणाले.
यामध्ये शिवसेना पुढाकार घेणार नाही पण, उद्धव ठाकरेंशी इतर नेते चर्चा करत आहेत. त्यामध्ये भाजपाचे वरिष्ठ नेतेही आहेत. शरद पवारांनी ही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जर ते हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती. कदाचित शरद पवारांच्या बाजूने पारडे झुकले असते. आजही भाजपाकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी जे बहुमत लागते ते नाही आहे. शरद पवार या निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर अनेक राज्यातून मतदान झाली असते. भाजपाची मदार खासदारांच्या मतांवर आहे आणि त्यांचे मूल्य सर्वाधिक असते. भाजपा फारतर १०० मतांनी पुढे असेल त्यामुळे सामना बरोबरीचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.