२०२० हे वर्ष संपण्यात अवघे काहीच दिवस बाकी आहेत. दरम्यान या यंदाच्या मावळत्या वर्षात काहीच चांगले घडले नाही. त्यामुळे “नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत,”अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमधून जोरदार टोलेबाजी केली आहे. यासह देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसतंय. कोरोना, लॉकडाउनमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि दुसरीकडे सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत राऊत यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर लक्ष्य केले आहे. “मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्य़ांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरू आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अयोध्येच्या राममंदिरासारखे भावनिक विषय उभे केले जातात, पण शेतकऱ्य़ांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही. हिंदुस्थानात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु चार-पाच उद्योगपती, दोन – चार राजकारणी व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसले. देशहिताचा विचार आता संपुचित ठरत आहे. पक्षहित व व्यक्तिपूजा म्हणजेच देशहित. राजकारणात फक्त स्वार्थ, कपटीपणा आणि शेवटी हिंसा इतकेच शिल्लक राहिले काय, असा प्रश्न पं. बंगालमधील सध्याचे वातावरण पाहून पडतो,” असं म्हणत राऊत यांनी नेहमीच्या अंदाजात मोदी सरकारला जोरदार चिमटे काढले आहेत.
टाळेबंदीतला देश
“मावळत्या वर्षाने काय पेरले, काय दिले ते आधी समजून घ्या. ‘कोविड-१९’ म्हणजे कोरोनामुळे देश सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टाळेबंदीतच राहिला. या काळात उद्योग बंद पडले. लोकांनी नोकऱ्या गमावल्या. लोकांचे पगार कमी झाले. अनेक कामगारांच्या चुली विझताना दिसल्या.” तर “भारत-चीनमध्ये याच काळात तणाव निर्माण झाला. चीनचे सैन्य २०२० मध्ये हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले. त्यांनी आपली जमीन ताब्यात घेतली. चिनी सैनिकांना आपल्याला मागे ढकलता आले नाही, पण लोकांचे लक्ष या संकटावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादाची नवी काडी टाकली गेली. चिनी माल व चिनी गुंतवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रचार झाला. चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आर्थिक संकटात सापडलेल्या जनरल मोटर्स कंपनीत पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार होती. आता ते होणार नाही. त्यामुळे जनरल मोटर्स बंद होईल. चिनी गुंतवणूक रोखण्यापेक्षा चीनचे सैन्य मागे ढकलले असते तर राष्ट्रवाद प्रखर तेजाने उजळून निघाला असता. ” असा टोला लावत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
लोकशाहीचा आत्मा
“मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरु आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे.”