कायम विनाअनुदानित शाळांच्या लक्षवेधीच्या मुद्यावर शिक्षक गेली ७ ते ८ वर्ष शाळेत कमी आणि आझाद मैदानात जास्त असतात. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षणाची काय अवस्था असेल, असा आरोप शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केला आहे. हिवाळी अधिनेशनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी हा आरोप केला आहे. आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचा कायम अनादर करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना मनिषा कायंदे आणि इतर शिक्षक आमदारांनी उलट सुलट प्रश्न विचारल्यावर चांगलीच भंबेरी उडाली. विनाअनुदानित शाळेच्या प्रश्नांवर उत्तर नसल्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आक्रमक झालेल्या शिक्षणमंत्र्यांना आपण सभागृहात काय बोलतो याचे भान न राहिल्याचे चित्र सभागृहात दिसले.
४ वर्ष संपली तर प्रश्न सोडवता येत नाही
विनाअनुदानित शाळेच्या प्रश्नाचे बिलकुल गांभीर्य नसल्यामुळे तावडे यांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला असे मनिषा कायंदे म्हणाल्या. याउलट फक्त हजार बाराशे शिक्षक आंदोलन करत असून, सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा दिला. परंतु सर्वच शिक्षक आमदारांनी या लक्षवेशी प्रश्नांची उचल केली असता मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याशी बोलून यावर उपाय काढतो असे आश्वासन त्यांनी दिले. मनिषा कायंदे या सभागृहात नवख्या असल्याने त्यांना सभागृह समजायला वेळ लागेल, अशी खोचक टीका करणाऱ्या तावडे यांना शिक्षणमंत्रीपदाची चार वर्षे संपली तरी अजूनही शिक्षकांचे मूलभूत प्रश्न त्यांना नवखे तर वाटत नसतील ना, अशी उपरोधिक टीका कायंदे यांनी केली.