गणपती म्हटलं की मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या देखील जास्त असते. यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी जादा ट्रेन, तसेच एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही एसटी महामंडळाने अशा जादा गाड्या सोडल्या. मात्र आज सकाळी बोरिवली डेपोतून खेडला जाणाऱ्या शिवशाही बसने वांद्रे टीचर्स कॉलनी या स्टॉपवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना न घेताच पुढे गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. बोरिवली येथील नॅन्सी कॉलनी डेपोतून सकाळी पाच वाजता सुटणारी शिवशाही बस साडे आठ वाजले तरी वांद्रे येथील टीचर्स कॉलनी स्टॉपवर पोहोचली नाही, त्यामुळे प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले.
एसटी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर नाही; प्रवाशांचा आरोप
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या बसची वांद्रे येथे येण्याची वेळ ६ वाजून १० मिनिट होती. मात्र साडे आठ वाजले तरी बस का पोहोचली नाही? अशी विचारणा जेव्हा केली तेव्हा प्रवाशांना समाधानकारक उत्तर न मिळता थोड्या वेळाने शिवशाही ऐवजी साधी बस सोडत असल्याचे उत्तर मिळाल्याचे प्रवासी रोहन मोरे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले. या बसची वाट पाहणारे १० प्रवासी या स्टॉपवर उभे होते.
अखेर वैतागून प्रवाशांनी गाठला कुर्ला डेपो
बसची वेळ सकाळी ६.१० ची असल्यामुळे आम्ही या ठीकाणी सकाळी ५.३० वाजल्यापासून उभे होतो, असा दावा प्रवाशांनी केला आहे. बस वेळेवर न आल्याने आणि एसटी प्रशासनाकडूनही योग्य उत्तर न मिळाल्याने प्रवाशांनी अखेर कुर्ला डेपो गाठला. त्यानंतर या प्रवाशांची कुर्ला येथून पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे प्रवासी रोहन मोरे यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत आपलं महानगरने एसटी प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाची प्रतिक्रिया विचारली. “बस सकाळी वेळेत सुटली होती. मात्र प्रवाशांना का घेतले नाही किंवा प्रवासी वेळेत पोहोचले की नाहीत? याची चौकशी करूनच अधिकृत माहिती देऊ”, असे जनसंपर्क अधिकऱ्यांनी सांगितले.